अरुण गोखले
आपल्या पुढ्यातले भरलेले ताट दुसऱ्याला द्यायला शिकविणारी आपली संस्कृती आहे. मला हवं असं माणसाला वाटणं ही त्याची प्रकृती आहे, फक्त मलाच हवं असं वाटणं ही त्याच्या मनाची विकृती आहे आणि माझ्या बरोबरच सर्वांनाच हवं हे मानणं आणि त्यासाठी प्रत्यक्ष तशी कृती करणं, प्रामाणिक प्रयत्न करणं ही आपली संस्कृती आहे.
आपल्या संस्कृतीने अन्न हे परब्रह्मरूप मानलेले आहे. पुढ्यातल्या भरलेल्या ताटाला नमस्कार करायचा, ते अन्न आपल्या ताटापर्यंत आणून पोहचविणाऱ्या ईश्वराचे, पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे, शिजवून ताटात वाढणाऱ्या लोकांचे आभार मानायचे आणि मग ते अन्न सेवन करायचे. ताटावरून भरल्या पोटी तृप्तीची ढेकर देऊन उठताना “अन्नदाता सुखी भव’ असा आशीर्वाद देणे ही आपल्याला शिकवण आहे. आपण अन्नाला परब्रह्म स्वरूप मानतो, त्याचे पूजन करतो, त्याचा आदर करतो कारण नाहीतरी भगवान श्रीकृष्णांनीच गीतेत हे सांगून ठेवले आहे की अन्नाच्या रूपाने मीच सर्व जीवांचे संवर्धन करीत असतो. माणसाचा देह अन्नावर पोसला जातो. माणसाचा आहार त्याची वृत्ती घडविते. जसा आहार तसे गुण, तसा विचार आणि मग पर्यायाने तसाच आचार हा माणसाच्या हातून घडत असतो. त्यासाठीच सात्विक शुद्ध आणि शाकाहारी आहार घेणे हेच हिताचे आहे असे शास्त्राने सांगितलेले आहे.
आपल्या धर्माने आपल्याला स्वत: बरोबरच इतरांच्याही तहान भूकेचा विचार करायला शिकविले आहे. त्यातूनच “अतिथी देवो भव’ ही संकल्पना आलेली आहे. तसेच पुण्यसंचयाचे जे अनेक मार्ग आहेत. त्यातील एक फार प्रभावी आणि जास्तीत जास्त पुण्य पदरी बांधून देणारे दान म्हणजेच अन्नदान असेही सांगून ठेवलेले आहे. कारण अन्य कोणत्याही वस्तूंचे धनाचे, मालमत्तेचे कितीही दान दिले तरी समोरचा याचक पुरे म्हणेलच अशी खात्री देता येत नाही आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे माणसाची हाव आणि लोभी वृत्ती.
परंतु अन्नदान हे एक असे दान आहे की ज्या दानास दात्याकडून पुरे आता पोट भरले आता नको, तृप्त झालो अशी पावती येते. हे फक्त अन्नदानाच्या बाबतीतच घडू शकते. अन्नाचे मोल आणि महत्त्व ओळखून त्याचा उचित आदर आणि वापर करण्यातच त्या परब्रह्माचा खरा आदर आहे.