संगमनेर – विविध शासकीय कार्यालये अन्यत्र हलविल्यानंतर आता घारगावचे पोलीस ठाणेही डोळासणे येथे हलविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. शासनाचा हा निर्णय घारगावकरांवर अन्याय करणारा असून येथील पोलीस ठाणे दुसरीकडे जावू देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा निर्धारही यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सन 2010 साली पठारभागातील 46 गावे व 30 वाड्या-वस्त्यांमिळून 92 हजार लोकसंख्येसाठी पठारभागात स्वतंत्र पोलीस ठाण्याला राज्य सरकारने मंजूरी दिली होती. घारगावमध्ये जागा उपलब्ध न झाल्याने मुळानदीच्या काठावरील जलसंपदा विभागाच्या जलमापक केंद्राची जुनाट इमारत तात्पुरत्या स्वरुपात वापरात आणण्याचा निर्णय घेतला गेला. तेव्हापासून पठारभागासाठी स्थापन करण्यात आलेले पोलीस ठाणे घारगावच्या मुळानदी काठावर सुरु आहे. पठारभागाच्या पोलीस ठाण्याला ना स्वतःची इमारत आहे, ना अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने. त्यामुळे हे पोलीस ठाणे नागरिकांना सोयीचे ठरले असले तरीही तेथे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मात्र सतत अडचणीचे ठरत आहे.
2015 रोजी घारगाव पोलीस ठाण्याची इमारत व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी 5 कोटी 79 लाख रुपयांचा निधीही मंजूर केला. त्यानंतरच्या काळात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी येथे भेटी देवून जागेची पाहणीही केली, मात्र निधी मिळून सात वर्षांचा काळ उलटूनही जागा मात्र निश्चित होवू शकली नाही. जागा मिळत नसल्यास अन्य ठिकाणच्या जागा पाहण्याचा विषय समोर आल्यानंतर घारगावपासून संगमनेरकडे 13 किलोमीटर अंतरावरील डोळासणे येथील शासनाची 64 गुंठे जागा उपलब्ध असल्याचा अहवाल संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांनी पाठविला आणि त्याला लागलीच मंजूरी मिळाली.
पोलीस ठाणे अन्यत्र हलविण्यास विरोध करीत या मुद्द्यासह पाच वर्षांपूर्वी घारगावहून संगमनेरला हलविलेले एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय पुन्हा घारगाव येथे सुरु करावे, बंद स्थितीत असलेले कृषी मंडल अधिकारी कार्यालय त्वरीत सुरु करावे, वनविभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारत व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, घारगाव महसूल मंडलासाठी स्वतंत्र मंडलाधिकाऱ्यांची नियुक्ति, पुणे-नाशिक महामार्गावरील बंदस्थितीत असलेले पथदिवे (स्ट्रीटलाईट) तातडीने सुरु करावेत, आंबीखालसा फाटा, घारगाव, बोटा, साकूर फाटा, डोळासणे, कर्जुले पठार, 19 मैल, चंदनापुरी इत्यादी गावांच्या हद्दीतील पथदिव्यांसह अपूर्ण असलेली महामार्गावरील सर्वकामे तातडीने पूर्ण करावीत व घारगाव महावितरण कंपनीच्या 5 एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफार्मर ऐवजी 10 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवावा अशा विविध मागण्या करण्यात करण्यात आल्या आहेत.
बसस्थानकासमोर बाजार समितीचे संचालक रमेश आहेर, चेअरमन ज्ञानदेव गाडेकर, माजी सरपंच सुरेश गाडेकर, माजी उपसरपंच सुरेश आहेर, राष्ट्रवादीचे मुन्ना शेख, सुनील आहेर, रामा आहेर, सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, सुभाष मुसळे, बाळासाहेब जाधव, हनुमंता आहेर, भाऊसाहेब गाडेकर, भाऊ आहेर, सचिन आहेर यांनी अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे.