सातारा – वाई तालुक्यामध्ये स्वतःच्या नावावर असलेल्या सहकारी संस्था नीट चालवा. उगाच “किसन वीर’ च्या नावाखाली सहकाराचे क्षेत्र बदनाम करू नका. कारखान्यात भ्रष्टाचार करून मी संपत्ती कमावली असेल तर मी माझी संपत्ती पाटील बंधूंना द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांची संपत्ती मला देण्याची तयारी ठेवावी, असा उपरोधिक टोला मदन भोसले यांनी पाटील बंधूंना लगावला.
कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने श्री. भोसले येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. बावधनच्या सूतगिरणीचे उदाहरण मदन भोसले यांनी दिले. भोसले म्हणाले, “”बावधनची चांगली चाललेली सूतगिरणी कोणामुळे बंद पडली, यांच्या कुटुंबीयातील दोघे ते तिघे तिथे आजही संचालक मंडळावर आहेत. ही सूतगिरणी कागदावर सहकार तत्त्वावर असली तरी प्रत्यक्षात खासगी तत्त्वावर चालवली जात आहे. यांच्या संचालक मंडळातील सहकाराचा गाढा अनुभव असलेल्या बाबासाहेब कदम यांना बोलवावे.
कदम यांना काही शंका असल्यास त्यांनी आमच्याशी चर्चा करावी त्यांच्या शंकांना मी उत्तर द्यायला तयार आहे. किमान त्यांच्या सहकाराचा अनुभव तरी विरोधकांनी करून घ्यावा.” पण मदन भोसले यांच्या राजकीय द्वेषापोटी “किसन वीर’ची आर्थिक कोंडी करून कोणी शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे आवाहन मदन भोसले यांनी केले. विरोधक नेहमीच किसन वीर कारखान्यावर साडेसातशे ते हजार कोटीचे कर्ज असल्याचा कांगावा करत आहेत. प्रत्यक्षात ते कर्ज तेवढे नाही. विरोधकांनी “किसन वीर’चे कर्ज कसे फेडणार हे तपशीलवार सांगावे. एकीकडे म्हणायचे की कारखान्याची “बॅलन्स शीट नीट नाही’. त्यांना कोणतीही बॅंक कर्ज देणार नाही.
मग असे असताना “किसन वीर’ निवडणूक लढवण्याचा अट्टाहास कशासाठी, लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकतो. पण शेतकऱ्यांची देणी आणि सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी पाटील बंधूंची आहे काय, असे प्रश्न त्यांनी केले. कारखाना चालवण्याची क्षमता आणि नियत ही तुमच्यामध्ये पहिल्यापासूनच नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे. मदन भोसले यांना कारखान्याच्या राजकारणात अडकवून ठेवले तरच आपली आमदारकी सुरक्षित राहील असा काही जणांचा अट्टाहास आहे. मात्र, पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या “किसन वीर’च्या सभासदांची हेळसांड करू नका आणि कारखान्याची बदनामी करू नका, इतकी तरी राजकीय सुचिता पाळा, असे आवाहनही मदन भोसले यांनी
केले.
सभासद विजय मिळवून देतील : भोसले
विरोधक केवळ दिशाभूल करून सहकार विभागाकडे वारंवार तक्रारी करत आहेत. किसन वीर कारखान्यावर सध्या वाईट परिस्थिती आली असली तरी यातून नक्कीच शेतकरी विकास पॅनेल मार्ग काढेल. सहा तालुक्यातील 52 हजार सभासद हे विश्वासाने आमच्याच पाठीशी असून ते आम्हाला निश्चितच यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवून देतील, असा विश्वासही मदन भोसले यांनी व्यक्त केला