हिंजवडी – मुळशीसह संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात ही केवळ बैलगाडा मालकांचीच नव्हे तर सर्वांचीच इच्छा आहे. परंतु हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून हा विषय प्राधान्याने खंडपीठापुढे यावा यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सरकारकडे तुमची बाजू मांडणार तसेच शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून कायदेशीर मार्गाने जे जे करणे शक्य आहे ते सर्वस्वी करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन भोर, वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तालुका बैलगाडा संघटनेला दिले.
सोमवारी (दि. 9) बैलगाडा मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासमवेत बैठक घेऊन आपले म्हणणे मांडले. मुळशी तालुक्याचे व सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार थोपटे यांना शर्यती सुरू करण्याबाबत व बैलगाडा मालकांना येत असलेल्या अडचणींसंदर्भात मुलखेडचे सरपंच सुखदेव तापकीर, अजित भेगडे, संजय गोडांबे, दादा शेळके, अरुण साखरे, योगेश साठे, संतोष गोडांबे, समीर शेलार यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
या कार्यक्रमास मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, बाजार समिती संचालक शिवाजी बुचडे, दादाराम मांडेकर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुहास भोते, भोर विधानसभा युवक अध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष गणेश पवळे, अतुल पवळे, कुमार शेडगे, चांदे गावचे सरपंच अशोक ओव्हाळ तसेच तालुक्यातील बैलगाडा मालक उपस्थित होते.
या वेळी आमदार थोपटे म्हणाले, बैलगाडा शर्यत हा विषय सद्यःस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ याबाबतीत निर्णय घेणार आहे. बैलगाडा शर्यतीचा विषय कायद्याच्या चाकोरीतून लवकर बाहेर काढण्यासाठी यासंदर्भात कायदेशीर बाबी तज्ज्ञांकडून तपासून घेऊन शर्यतीला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी बैलगाडा शर्यतीचा विषय प्राधान्याने खंडपीठासमोर यावा म्हणून संपूर्ण प्रयत्न करणार आहे.