चिंतामणी गो. वैजापूरकर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 नोव्हेंबर 2021 रोजी दोन योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यापैकी एक आहे “आरबीआय रिटेल डायरेक्ट स्किम’.
आरबीआय रिटेल डायरेक्ट स्किम या योजनेची माहिती देताना, पंतप्रधानांनी सामान्य नागरिकांसाठी सध्याच्या प्रचलित व्याजदरापेक्षा जास्त व्याजदराची योजना आणल्याचे सांगितले आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या सध्याच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये म्हणजे बॅंक ठेवी, पोस्टमधील गुंतवणूक, म्यूचुअल फंड, शेअर मार्केट या व्यतिरिक्त सरकारी कर्ज रोखे हे नवे दालन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ह्या गुंतवणुकीच्या फायदा/तोट्यांचा परामर्श घेणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांसाठी ते गुंतवणूक करीत असलेल्या साधनामुळे किती परतावा आहे त्याची तरलता (लिक्विडिटी) कशी आहे आणि त्यामध्ये जोखीम (रिस्क) कशा आहेत याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
सदरची योजना ही सरकारी कर्ज रोख्यांमधील गुंतवणुकीची आहे, सरकारी कर्ज रोखे हे प्रामुख्याने भारत सरकारचे वार्षिक बजेटमध्ये उत्पन्न/खर्च यामधील तूट भरून काढण्यासाठी रोखे बाजारात सरकार आरबीआयच्या मार्फत बाजारात आणतात.
सध्या यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील/खासगी क्षेत्रातील बॅंका, सहकारी बॅंका, म्यूचुअल फंडस, एलआयसीज् प्रायमरी डीलर्स, फॉरेन बॅंक ह्या यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करीत असतात. बॅंकांसाठी सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक ही एसएलआर गुंतवणूक म्हणून धरत असल्यामुळे त्यामध्ये बॅंकेच्या ठेवीच्या प्रमाणात गुंतवणूक करणे कायद्याने बंधनकारक असते. सदर रोख्यांचा मार्केट लॉट 5 कोटींचा असून त्यांची दर्शनी किंमत 100 इतकी असते. सदर रोख्यांवरील व्याजाचा दर हा Yield Base Auction नुसार ठरतो, सदर रोख्यांचा कालावधी हा 1 वर्षापासून 40 वर्षांपर्यंतचा आहे. उदा., 6.10% – 2031 हा रोखा आहे.
यामध्ये 6.10% वार्षिक व्याज असून त्याचा कालावधी 10 वर्षे मुदतीचा आहे. याचप्रमाणे जेवढा कालावधी कमी तेवढे व्याज कमी, जेवढा कालावधी जास्त त्यावरील व्याज जास्त याप्रकारे सर्वसाधारणपणे आहे. सदरचे व्याजाच्या उत्पन्नावर आयकर वजावट होत नाही मात्र व्याजाचे उत्पन्न कर पात्र असते. सदर रोख्यांवरती मिळणारे व्याज हे दर सहामाहीस मिळते. यामध्ये मासिक/त्रैमासिक/वार्षिक व्याज देण्याची सुविधा नाही. सदरचे रोखे ह्यांना भारत सरकारची हमी असते. मुदत संपल्यावर 100/- प्रती रोखा यानुसारच रक्कम परत मिळते. सदरचे रोखे ह्यांची शेअर मार्केट सारखी रोज खरेदी/विक्री होत असून यावरती आरबीआयचे संपूर्ण नियंत्रण असते.
सदर रोख्यांमधील उलाढाल दररोज साधारणपणे 10 हजार ते 30 हजार कोटींच्या दरम्यान होते. ह्यामध्ये विविध व्याजदराचे, विविध मुदतीचे रोखे असून त्यांच्या किमती ह्या प्रामुख्याने US FED RATE, Crude oil Price, Inflation, Dollar यावरती ठरतात. सदर मार्केटला Fixed Income, Money Market, Debt Market असे संबोधण्यात येत असून, सर्व व्यवहार हे DVP (Delivery vs Payment) पारदर्शक असून आरबीआयचे NDS – OM (Negotiated Dealing System – order Matching) ह्या संगणकीकृत प्ल्टफॉर्मवर होतात. सध्याच्या ह्या मार्केटची पूर्वपिठीका ही सामान्य नागरिकांना माहिती व्हावी ह्यासाठी दिली. आता आपण नुकतीच भारत सरकार/अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या (RBI Direct Scheme) ची काय वैशिष्ट्ये आहेत याचा थोडक्यात परामर्श घेऊ.
प्रमुख वैशिष्ट्ये-
1) खाते पूर्णपणे ऑनलाइल पद्धतीने उघडले जाते. 2) वैयक्तिक अथवा संयुक्त खाते उघडता येते. 3) के.वाय.सी. प्रक्रिया आधार अथवा पॅन कार्ड वरून ऑनलाइन होते. 4) स्कॅन चेक आणि स्कॅन साइन ऑन व्हाइट पेपर हे खाते उघडते वेळेस तयार ठेवावे. 5) खाते उघडल्यानंतर 24 तासांत ऍक्टिव्ह होते. 6) ऑनलाइन नामनिर्देशन सुविधा खाते उघडतानाच करता येते. 7) व्याज रकमेवर टी.डी.एस. कापला जात नाही. मात्र व्याज करपात्र आहे. 8) Sovergin Guarantee असल्याने मुद्दलाची रिस्क नाही. 9) शेअर बाजाराप्रमाणेच प्रायमरी अँड सेकंडरी अशी गुंतवणूक करता येते.
10) मागील आर्थिक वर्षात सर्वसाधारणपणे बॅंकाना 7.00% पर्यंत रिटर्न मिळाला आहे. 11) नियमित (दर सहा महिन्यास) व्याज आणि capital appreciation ची आणि नफा कमविण्याची संधी आहे. 12) खाते उघडणे पासून सेटलमेंट पर्यंतची संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया. 13) प्रत्येक व्यवहाराला उउखङ CCIL (RBI subsidiary) ची हमी. आता ह्या नव्या योजनेमध्ये गुंतवणुकीची वैशिष्ट्ये आपण पाहिलीत, परंतु त्याचवेळी यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ह्यामधील जोखीम पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
1) सदर रोख्यांच्या मुदती ह्या 5, 7, 10, 12, 15, 20, 25 अशा असतात. सामान्य नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक जबाबदारीशी पडताळून पाहाव्यात. 2) सदर रोख्याचं मुदत पूर्व रोखीकरण होत नाही, यासाठी ते आपल्याला मार्केटमध्ये जाऊन विकावे लागतील, त्याचा दर मार्केटनुसार असतो. आपल्या गुंतवणुकीच्या दरानुसार नाही. 3) विशेषतः सध्या ठेवीवरील व्याजदर हे 5% जवळपास असून 10 वर्षे मुदतीच्या रोख्यावरील व्याज 6.30% आहे मात्र भविष्यामध्ये व्याजदरामध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा रोखे बाजारात होत नाही. आपणास मिळणारे रोख्यांवरील व्याज त्याच्या मुदतीपर्यंत स्थिर असते. 4) रोखे बाजारातील रोख्यांचे धळशश्रव (व्याज) आणि त्यांचे बाजारी मूल्य हे परस्पर विरुद्ध असते याची काळजी घ्यावी म्हणजेच व्याजदर वाढ सुरू झाल्यावर रोख्यांच्या किमतीत घसरण होत असते.
सदर योजनेचे फायदे व त्यामधील जोखीम हे दोन्ही आपल्यासमोर विशद केले असून, त्याचा उद्देशच गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशाचे योग्य नियोजन करून परतावा मिळावा हाच आहे. त्यामुळे भारत सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ/फायदा डोळसपणे घेतल्यासच ही योजना सुवर्णसंधी ठरेल.