देशात उभ्या राहिलेल्या विरोधकांच्या “इंडिया’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. “इंडिया’ आघाडीचे नेते देशभरात जिथे कुठे पत्रकार परिषद घेतात, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना हा प्रश्न विचारला जातो. मग इंडिया आघाडीतील घटकपक्षाचे नेते काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेतात. त्यांना या प्रश्नाचे नेमके उत्तर देता येत नाही. काहीवेळा काही प्रादेशिक पक्षांचे नेते मग आडूनआडून आपल्या पक्षाच्या प्रमुखाचे नाव पुढे करतात. पण कॉंग्रेसच्या नेत्यांना आपले नेते राहुल गांधी यांचे नाव ठामपणे पुढे करता येत नाही. “इंडिया’ आघाडीत या नावावरून वादंग निर्माण होऊ नये यासाठी घेतली जाणारी ही दक्षता असते. पण मूळ प्रश्न कायमच राहतो आणि त्यावर नेमके चपखल उत्तर काय द्यावे, असा कॉंग्रेस नेत्यांपुढचा प्रश्न संपत नाही. पण काल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावर चपखल उत्तर दिले आहे.
काल पत्रकारांनी त्यांनाही तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना पटोले म्हणाले की, आमच्या आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवारांची कमतरता नाही, त्या क्षमतेचे अनेक नेते आमच्याकडे आहेत, उलट भाजपकडेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची वानवा आहे. आता मोदींचा चेहरा चालत नाही, पण दुसरा उमेदवार त्यांना सापडत नाही, असे टोकदार उत्तर त्यांनी दिले आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांना हे नवीन उत्तर सापडल्याने त्यांची आता या प्रश्नावर उत्तर देताना फार कोंडी होणार नाही. तथापि, हे जरी असले तरी इंडिया आघाडीच्या नेत्यांना या संबंधातील आपली ठोस भूमिका आता निश्चित करावीच लागणार आहे. या आघाडीची तिसरी महत्त्वाची बैठक 31 ऑगस्टपासून मुंबईत सुरू होणार आहे.
दोन दिवसांच्या या बैठकीच्या अजेंड्यावर पंतप्रधानपदाचा विषय नाही. मुंबईतल्या बैठकीत केवळ आघाडीचा किमान समान कार्यक्रम आणि जागावाटपाचे धोरण या मुद्द्यांवरच विचारविनिमय होणार आहे. तिकडे मोदींनी लालकिल्ल्यावरील भाषणात पुढील वर्षी आपल्याच हस्ते ध्वजवंदन होईल, असे नमूद करून पुढचे पंतप्रधान आपणच आहोत अशी घोषणा करून टाकली आहे. एकीकडे पंतप्रधानपदाचा निश्चित चेहरा आणि दुसरीकडे मात्र गोंधळाचे वातावरण असे जे चित्र निर्माण होऊ पाहात आहे ते इंडिया आघाडीला लाभदायी ठरणार नाही. ज्या पक्षाचे जादा खासदार निवडून येतील त्या पक्षाचा नेता पंतप्रधान होईल, असे विरोधी आघाडीचे धोरण असावे असे दिसते आहे. पण या निकषात केवळ कॉंग्रेस पक्षच बसतो, कारण इतर घटक पक्षांच्या मानाने त्यांचेच उमेदवार जास्त निवडून येणार, कॉंग्रेसलाच सर्वाधिक जागा लढवण्याची संधी उपलब्ध होणार हे सरळ गणित असताना कॉंग्रेसच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवू आणि कॉंग्रेसचाच उमेदवार पंतप्रधानपदावर विराजमान होईल अशी ठाम भूमिका या आघाडीला का घेता येत नसावी, हा मूलभूत प्रश्न आहे.
तुम्ही जर अजून कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार आहात हेच जर जनतेला नीट स्पष्ट करून सांगणार नसाल तर निवडणूक निकालानंतर विरोधी आघाडीत नेतृत्वावरून गोंधळाचे वातावरण निर्माण होणार नाही हे कशावरून, असा प्रश्न जनतेच्या मनात असेल. अशा भ्रामक स्थितीत मग मोदींना पर्याय म्हणून हा गोंधळाचा पर्याय जनतेने का स्वीकारावा, असाही प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. त्यामुळे इंडिया आघाडीने ही संभ्रमाची अवस्था वेळीच दूर करावी अशी अपेक्षा आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हाच संभ्रम शेवटपर्यंत कायम ठेवला गेला होता, त्याचा मोठा फटका त्यावेळी विरोधकांना बसला होता हे त्यांना विसरून चालणार नाही. मोदींचा पराभव हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे, पण मग मोदींना पर्याय म्हणून तुम्ही कोणाला आणणार आहात हे जर तुम्ही अजून स्पष्ट करणार नसाल, तर तुमच्या त्या कथित एकजुटीला काही अर्थ उरत नाही.
ज्या अर्थी तुम्ही हे अजून ठरवलेले नाही त्या अर्थी तुमच्या आघाडीत एकवाक्यता नाही हे उघड आहे, असा मुद्दा भाजपकडून उपस्थित होत राहणार. या देशात अस्थिर राजकीय स्थितीत देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर अशा नेत्यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. तशीच लॉटरी उद्या आपल्यालाही लागू शकते असे स्वप्नरंजन इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यामध्ये सुरू झाले असावे. त्याचीच परिणिती म्हणून इंडिया आघाडीला आपला उमेदवार जाहीर करण्यात अडचणी येत असाव्यात. दुसरीकडे, कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी यांची पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्याची मनोमन तयारी आहे काय, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. राहुल गांधी यांना महात्मा गांधी यांच्या मॉडेलचे राजकारण करायची इच्छा आहे त्यामुळे इंडिया आघाडी सत्तेवर आली तरी राहुल गांधी स्वत: पंतप्रधान होणार नाहीत, असा काही राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.
यूपीएच्यावेळी सोनियांनी पंतप्रधानपद सोडून डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले होते व सोनियांची प्रतिमा “मोअर दॅन पीएम’ अशी झाली होती. त्यामुळे याही वेळी राहुल गांधी हाच प्रयोग करणार असल्याची शक्यता काही जण बोलून दाखवत आहेत. पण राहुल गांधींकडून त्या विषयीचे कोणतेच संकेत अजून दिले गेलेले नाहीत. जर राहुल पंतप्रधान होणार नसतील तर आपला नंबर लागू शकतो असा विचार प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या मनात घोळत असल्याने तेही कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल आणि कॉंग्रेस पक्ष ठरवेल तोच पंतप्रधान आम्ही मान्य करू अशी भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांना या प्रश्नावरील उत्तर देताना बरीच कसरत करावी लागत आहे. त्यावर पटोले यांनी दिलेल्या उत्तराची लाइन इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी पकडणे आणि पटोलेंनी दिलेले उत्तरच त्यांनी देत राहण्याने थोडीतरी स्थिती सावरू शकते व गोंधळाचे वातावरण निवळण्यास मदत होऊ शकते, हे मात्र खरे.