मंत्री गडकरी यांचे आदेश
कोपरगाव – नगर-मनमाड महामार्ग वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला असून, या मार्गाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून अपघात वाढून निरपराध व्यक्तींचे बळी जाऊ लागले आहेत. तेव्हा सरकारने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, या मागणीसाठी भाजपच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांनी आज (गुरुवार) भर पावसात नगर-मनमाड महामार्गावर लायन्स मूकबधिर विद्यालयाजवळ तीन तास आंदोलन केले. खड्डे बुजवा जीव वाचवा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे यांना या वेळी निवेदन देण्यात आले.
संगमनेर कार्यालयाचे उपविभागीय अभियंता एस.टी. बडगुजर यांनी गुडघाभर पाणी असलेल्या खड्ड्यात बसूनच त्याचा स्वीकार केला. सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्याच्या निविदा मंजूर झाल्या असून त्याचे काम तात्काळ हाती घेण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी दिले असल्याचे एस.टी बडगुजर यांनी यावेळी सांगितले. खड्डे सर्वप्रथम बुजवले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वास महाले, सतीश आव्हाड, बापूसाहेब बाराहाते, आप्पासाहेब दवंगे, शिवाजी वक्ते, मधुकर वक्ते, प्रदीप नवले, बाळासाहेब वक्ते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, शिल्पा रोहमारे, वैशाली आढाव, बाळासाहेब पानगव्हाणे, प्रहार संघटना, रामदास शिंदे, दीपक चौधरी, रामभाऊ कासार, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, बाबा दहे, विनोद राक्षे, भीमा संवत्सरकर, यादवराव संवत्सरकर आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाल्या की, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ताकामाच्या निविदा नुकत्याच काढल्या आहेत. मात्र, सध्या दिवाळी सण जवळ आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी सर्वांनाच नित्यनेमाने प्रवास करावा लागत आहे. शेतीच्या कामाची लगबग वाढली आहे. रात्री-अपरात्री प्रवास करताना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम तोंडावर आले आहेत.
अनेकांचे हात, पाय, कंबर, मणके मोडले असून, कायमचे जायबंदी होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे खड्डे तातडीने बुजवले गेले नाहीत तर त्यातून अपघाताचे प्रमाण दुप्पट वाढेल प्रवाशांचा बळी जाईल. त्यासाठी तातडीची निकड म्हणून हे खड्डे तातडीने बुजवावेत, असे त्या म्हणाल्या. या आंदोलनाची दखल घेऊन मंत्री गडकरी यांनी या महामार्गावरील तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.