Rahul Gandhi – भाजप सरकारने आमच्यावर पाहिजे तितके खटले दाखल करावेत पण त्यामुळे आम्ही दबून जाणार नाही असे जाहीर आव्हान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज येथील जाहीर सभेत बोलताना दिले. आसाम मधील बारपेटा जिल्ह्यातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या 7 व्या दिवशी आपल्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करताना, राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर जोरदार टीका केली. आसामचे मुख्यमंत्री देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, जमीनीच्या घोटाळ्यांसह त्यांनी अनेक आर्थिक गैरव्यवहार केले आहेत. आणि ते सुपारी नेते आहेत असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, मला कळत नाही की हिमंता बिस्वा सरमा यांना माझ्यावर केसेस करून मला धमकावता येईल अशी कल्पना तरी त्यांच्या मनात कशी आली. तुम्ही जितके खटले दाखल करू शकता तितके दाखल करा. आणखी २५ खटले दाखल करा, मी घाबरणार नाही. भाजप-आरएसएस मला धमकावू शकत नाही असे ते म्हणाले. गुवाहाटी पोलिसांनी मंगळवारी स्वतःहून राहुल गांधी आणि इतर नेत्यांविरुद्ध गुवाहाटीत हिंसाचार माजवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.
ते म्हणाले की मी मोदींचे खास मित्र अदानी यांच्या विरोधात भाषण केले आणि माझ्यावर खटला दाखल झाला. नंतर मला संसदेतून हाकलून दिले, त्यांनी माझे दिल्लीतील सरकारी घरही हिसकावले. माझे घर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हृदयात आहे, मी तिथे राहतो. माझ्याकडे आसाम, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि इतर सर्व राज्यांमध्ये लाखो घरे आहेत, असे त्यांनी नमूद केले त्यावेळी उपस्थितांना त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला.
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मालकीच्या मीडिया समूहाचा संदर्भ देत गांधी यांनी आरोप केला की त्यांचा टीव्ही मीडिया राज्यात सरमा यांना काय हवे आहे तेवढेच दाखवते.सरमा यांच्यावर अमित शहांचे नियंत्रण आहे. अमित शाह यांच्या विरोधात कोणी काही बोलले तर सरमा त्यांना दोन मिनिटांत हाकलून देतात. तरुण गोगोई हे देखील मुख्यमंत्री होते, पण त्यांनी आसामला जे हवे होते ते केले. तरुण गोगोई माझे गुरू होते, पण मी त्यांनी काय करावे हे त्यांना कधीच सांगितले नाही असेही त्यांनी नमूद केले.
“भाजप-आरएसएसला आसामची भाषा, संस्कृती आणि इतिहास पुसून टाकायचा आहे. त्यांना तुमच्या पूर्वजांनी दिलेले शिक्षण संपवायचे आहे. त्यांना नागपूरमधून आसाम चालवायचा आहे, पण आम्ही ते होऊ देणार नाही. आसामला आसाममधून चालवायचे आहे असे राहुल यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सरमा यांच्या हृदयात केवळ द्वेष भरला आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
“भारत जोडो यात्रेत आम्ही लाखो लोकांशी बोलतो, प्रत्येकाने आम्हाला सांगितले की भारतात द्वेष चालणार नाही, इथे प्रेम चालते. हा प्रेमाचा देश आहे”, असे ते पुढे म्हणाले. भाजप-आरएसएसच्या विचारसरणीने मणिपूरला अनेक महिने जाळले असून अजूनही लोक मारले जात आहेत आणि घरे जाळली जात आहेत, परंतु देशाच्या पंतप्रधानांनी आजपर्यंत राज्याला भेट दिली नाही, असा आरोप गांधी यांनी केला.