संतोष पवार
सातारा – करोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा जून महिन्यात सुरु होणार की नाही, याची शाश्वती सध्या तरी कोणीच देत नाही. शाळांनी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरु केली असली तरी शाळा कधी सुरु होणार याचीच चिंता पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना लागून राहिली आहे. करोनाच्या धास्तीने शैक्षणिक नुकसानीची भीती निर्माण झाली असून सरकारने याबाबत आवश्यक उपाययोजना करुन चिंता दूर करावी, अशी मागणी होत आहे.
करोनाच्या जागतिक संकटामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मार्च, एप्रिल महिन्यात होणाऱ्या शैक्षणिक परीक्षाही झाल्या नाहीत. संकटाची व्याप्ती एवढी मोठी आहे की सरकारला परीक्षा रद्द कराव्या लागल्या. करोनाचा प्रसार संसर्गाने होत असल्याने परीक्षा टाळण्याशिवाय सरकारकडे पर्यायच नव्हता. पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे आदेश सरकारने दिले. त्यामुळे गेल्यावर्षीही थोड्या प्रमाणात का होईना पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन महिन्यांपासूनचे लॉकडाऊन दि. 31 पर्यंत राहणार आहे. त्यापुढे सरकार काय निर्णय घेतेय याचीच उत्सुकता पालक व विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. करोनाचे संकट अजूनही कायम आहे त्यामुळे दरवर्षी दि. 15 जूनला सुरु होणाऱ्या शाळा यावर्षी वेळेत सुरु होतील अशी अपेक्षा सध्या तरी नाही.
सातारा जिल्ह्यात आजअखेर 181 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. वाई, महाबळेश्वर तालुके वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यात करोनाने शिरकाव केला आहे. अजूनही नियमित येणारी बाधितांची संख्या धडकी भरवणारी आहे. सध्या परजिल्हे, परराज्यातून शहरी व ग्रामीण भागात आलेले अनेक नागरिक बाधित सापडत आहेत. प्रशासनाची परवानगी घेवून येणारे व विनापरवाना येणाऱ्यांची विलगीकरण कक्षात आणि काही ठिकाणी घरांमध्येही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विलगीकरणासाठी शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरु होतील, अशी शक्यता सध्यातरी दिसत नाही.
करोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर शाळा, महाविद्यालये निर्जंतुकीकरण करुन नंतरच शाळा सुरु होऊ शकतात. मात्र, यामध्ये नेमका किती कालावधी जाईल याची शाश्वती कोणीच देत नाही. सद्यपरिस्थितीत निदान जून महिन्यात तरी शाळा सुरु होतील असे वाटत नाही. शाळा सुरु करण्याचा शासनाने प्रयत्न केला तरी करोनाच्या धास्तीने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील असे वाटत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुस्तके छापून तयार
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके देण्याचा उपक्रम शिक्षण विभागाकडून राबवण्यात येतो. राज्यातील विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके छापून तयार आहेत. मात्र, करोनाच्या धास्तीमुळे अद्याप पुस्तके आणण्यात आली नाहीत. करोनाचे संकट जसजसे दूर होईल तशी पुस्तके आणून प्रत्येक तालुक्यात पोहचवण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो हे कोणीच सांगू शकत नाही.