लाखणगाव-राज्य सरकार कधी कर्जमाफी करणार या निर्णयाकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. निवडणूकीत केलेली घोषणा कधी अंमलात येणार याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना पक्षाने संपूर्ण कर्जमाफी करू असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन झाली. सत्ता स्थापन होऊन अनेक दिवस उलटून गेले आहेत.
सरकार कर्जमाफी बाबत विचाराधीन असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र अजूनही कर्जमाफीची घोषणा झाली नाही. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? जर झाली तर सरसकट कर्जमाफी होणार का पुन्हा मागील सरकार सारखे नियम आणि अटी लावून अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित रहावे लागेल. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. मागील वर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे तसेच यावर्षी झालेल्या अति पावसामुळे शेतकरी वर्ग गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे सरकार कडून कर्जमाफी व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अजून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे सरकार निर्णय कधी घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.