मुंबई – कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची (Farmer) सरकारने घोर फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात गोगलगाईंच्या उच्छादामुळे शेतकरी संकटात असून सरकारच्या फसव्या धोरणामुळे तो हताश झाला आहे. यामुळे कंत्राटशाहीचा पुरस्कार करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadanvis Sarkar) शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी दिला.
वडेट्टीवार म्हणाले, कापसाचा दर्जा चांगला असताना 5400 रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे. केंद्र सरकारने कापसाला 2023-24 या हंगामात मध्यम धाग्यासाठी 6620 आणि लांब धाग्याला 7020 रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. परंतु, तो कागदावरच राहिला. सध्या हमी भावापेक्षा 1200 ते 1600 रुपये कमी दराने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला जात आहे.
तसेच सोयाबीनची आधारभूत किमत प्रति क्विंटल 4600 रुपये आहे. पण आज आधारभूत किमतीपेक्षा 500 ते 700 रुपये कमी दर सोयाबीनला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या फसवणुकीकडे सरकार जाणीवपूर्णक दुर्लक्ष करत आहे. सरकारने हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करावी, तातडीने शासकीय खरेदी सुरु करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शेतकऱ्यांना ठोस मदत द्यावी
मराठवाड्यातील 55 हजार हेक्टर क्षेत्राला गोगलगाईंचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला असून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. सध्या शेतकरी मोठ्या संकटात आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ठोस मदत दिली पाहिजे. खरीपाबरोबर फळबागांनाही गोगलगाईंचा प्रादुर्भाव होत आहे. हा प्रादुर्भावर रोखण्यात सरकारला अपयश आले असून सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.