नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भाजप नेते मनोज तिवारी यांना मानहानीच्या फौजदारी खटल्यात येथील ट्रायल कोर्टाने बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला आहे. मनोज तिवारी यांनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
तेथे त्यांची याचिका अमान्य करण्यात आल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु त्यांना तेथेही दिलासा मिळू शकला नाही. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप केल्यामुळे सिसोदिया यांनी त्यांच्यावर बदनामीचा खासगी फौजदारी खटला दाखल केला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे मुरजी पटेलांचे कार्यकर्ते संतप्त https://t.co/3M4X5DnU5q
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 17, 2022
सिसोदिया यांनी भाजप नेते खासदार मनोज तिवारी यांच्या बरोबरच हंस राज हंस, प्रवेश वर्मा, आमदार मनजिंदर सिंग सिरसा आणि भाजपचे प्रवक्ते हरीश खुराना या भाजप नेत्यांच्या विरोधातही हा बदनामीचा खटला दाखल केला आहे.
दिल्ली सरकारी शाळेच्या वर्गखोल्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप या भाजप नेत्यांनी सिसोदिया यांच्यावर केला होता. दरम्यान दिल्ली हायकोर्टाच्या या प्रकरणातील आदेशाच्या विरोधात याच खटल्यातील एक आरोपी विजयेंद्र गुप्ता या भाजप नेत्याची आव्हान याचिका मात्र सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे.