मंचर (प्रतिनिधी) – राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नेतेमंडळी विविध माध्यमातून प्रचार करताना दिसत आहे. मात्र, निवडणुकीच्या दरम्यानच गावोगावच्या जत्रा, यात्रा, उत्सव व लग्न सोहळे आल्याने या कार्यक्रमातही नेते मंडळी, उमेदवार हजेरी लावून आपापल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. एकाच दिवशी अनेक गावच्या जत्रा, लग्न असल्याने विविध पक्षाचे नेते मंडळी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहे.
यंदाच्या निवडणुकीत सर्व पक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पुणे जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचे उमेदवार गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील गाव गावचे यात्रा, जत्रा, उत्सव सुरू झाले असल्याने त्यानिमित्त बैलगाडा शर्यती, कुस्त्यांच्या आखाडे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
या कार्यक्रमांना हजारो नागरिक उपस्थित राहत असल्याने उमेदवार नेते मंडळी या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत आहेत. बैलगाडा घाटात उमेदवार नेते मंडळी भेट देत आपापल्या प्रचार करत आहेत. तर गावोगावी लग्नाचा हंगामा ही सुरू असल्याने गावागावातील सामुदायिक विवाह सोहळे, लग्न कार्यक्रमांना नेते मंडळी भेट देत आहेत.
उमेदवाराला एकाच वेळी अनेक कार्यक्रमाला जाणे शक्य नसते तरी त्यांचे कार्यकर्ते नेते कार्यक्रमांना हजेरी लावत आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. एकाच ठिकाणी मतदारांचा जनसमुदाय जमत असल्याने यात्रा, जत्रा व लग्न कार्याला आवर्जून भेट देण्यावर जोर आहे.
आयते व्यासपीठ उपलब्ध…
अनेक नेते मंडळी पुढारी लग्न कार्यक्रमात वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी माईकचा ताबा घेत आपल्या नेत्याच्या प्रचार करत असून आपल्या नेत्यांनी काय काम केले ? आपल्या नेता निवडून आल्यावर काय करू शकतो ? याबाबत माहिती सांगत आहेत. त्यामुळे राजकीय मंडळींना हजारो वऱ्हाडी समोर किंवा यात्रेतील नागरिकांसमोर जाण्यासाठी आयती संधी मिळाली आहे आणि त्याचा ते फायदा निवडणुकीसाठी उठवत आहे.