मंचर, (प्रतिनिधी) – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील एस.एस.सी. १९९९-२००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षानंतर एकत्र येऊन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच स्नेह मेळावा संपन्न झाला.
शिक्षक, विद्यार्थ्याच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे प्रतीक असलेल्या वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केले आणि वटवृक्षाप्रमाणे सर्वांनी नेहमी सुख दुःखात एकत्र राहण्याचा संकल्प केला. त्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनामध्ये (मासवडी) वर ताव मारून सर्व खुश झाले.
मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि विद्यमान शिक्षकांवर विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजूने रांगेत उभे राहून मनमोहक फुलांची पुष्पवृष्टी केली. माजी विद्यार्थिनींनी औक्षण केल्याने शिक्षक भारावून गेले. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अश्विनी शिंदे व रोहिणी लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. लेखक नवनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
सर्व गुरुजनांचा सन्मान पुस्तके आणि सन्मानचिन्ह देऊन सर्वांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. एस. महामुनी होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक बांधवांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी जूने प्रसंग,चुटकुले सांगून जुन्या आठवणी जागृत केल्या.
कार्यक्रमासाठी ११५ माजी विद्यार्थी तसेच २० शिक्षक उपस्थित होते. जुन्या मित्र-मैत्रिणींना व शिक्षकांना भेटण्यासाठी विद्यार्थी पुणे, मुंबई या ठिकाणाहून तर काही शिक्षकवृंद सातारा,सांगली इतक्या दूरवरून वेळात वेळ काढून उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. जाधव, काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष उद्योजक भरतशेठ भोर, माजी सरपंच शकुंतला शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मनोज शिंदे, स्वप्निल घाटकर, विजया शिंदे, राजश्री गांजाळे, भारती कामठे, दीपक अभंग, राहुल डोके, किशोर आरुडे, दर्शना ननवरे,संदीप शिंदे यांनी केले. विशाल टेमकर यांनी आभार मानले.