- कार्यालयात जावून जीवे मारण्याची धमकी
देहूगाव – थकित बील न भरल्याने वीज जोड महावितरण कर्मचाऱ्यांकडून तोडण्यात आले. त्याचा राग मनात धरून तिघांनी वीज जोड तोडणाऱ्या महावितरणच्या दोघा कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 11) बाराच्या सुमारास देहूगाव येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघाला अटक केली आहे.
दीपक पांडुरंग चव्हाण (वय 36), निखील पांडुरंग चव्हाण (वय 28) आणि विक्रम पांडुरंग चव्हाण (वय 30, सर्व रा. देहू-आळंदी रोड, महालक्ष्मीनगर, देहूगाव कमानीजवळ, देहूगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
संदीप विठ्ठल रोडे (वय 26, रा. आळंदी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, ते महावितरण शाखेचे कर्मचारी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव महालक्ष्मीनगर येथे चव्हाण यांचे व्यवसायिक गाळे आहेत. त्याचे वीजबिल मागील काही महिन्यांपासून थकीत असल्याने महावितरणचे कर्मचारी मारोती किशनराव गदादे आणि रोडे यांनी त्यांचे वीज जोड तोडल्याच्या कारणावरून मनात राग धरून दीपक, निखिल आणि विक्रम या तिघांनी महावितरणच्या दोघा कर्मचाऱ्यांना हाताने लाथाबुक् क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी केली.
तसेच देहूगाव येथील महावितरण शाखेतील कार्यालयात जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देहुरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर तपास करीत आहेत.