मुंबई – नवाब मलिक यांचे गॅंगस्टर्सशी संबंध आहेत आणि त्याचे पुरावे मी दिवाळीनंतर देईन असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आज नवाब मलिक यांनी म्हटले आहे की जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी दिवाळी संपण्याची वाट पाहू नये.
मलिक यांनी आणखी म्हटले आहे की, फडणवीस पुर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री होते. राज्याचे गृहमंत्रालयही त्यांच्याच अखत्यारीत होते. प्रथेनुसार मुंबईत कायकाय चालते याची नियमीत ब्रिफिंग मुख्यमंत्र्यांना होत असते.
त्याकाळात मुख्यमंत्र्यांना माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत याची माहिती मिळाली नव्हती काय आणि जर मिळाली होती तर त्यांनी त्याचवेळी माझ्यावर का कारवाई केली नाही असा प्रश्नही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. ड्रग पेडलर राणा हाच अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रायोजक होता असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. माझ्या जावयाकडे गांजा सापडल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
तथापि त्यावेळचा एनसीबीचा पंचनामा मलिक यांनी पत्रकारांना सादर केला. त्यात असा कोणताही उल्लेख नाही त्यामुळे फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. फडणवीसांच्या राज्यात जे काही काळे धंदे सुरू होते आणि त्यात भाजपचेच लोक कसे सहभागी होते याविषयी फडणवीस यांना खूप पुर्वीच सावध केले होते पण त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही असेही मलिक यांनी म्हटले आहे.
माझ्या आरोपांविषयी केवळ हवेत गोळीबार करून फडणवीसांना पळ काढता येणार नाही. आमच्या प्रश्नांची त्यांना आता उत्तरे द्यावीच लागती असेही मलिक यांनी म्हटले आहे.
मलिक यांनी जेएनपीटी बंदरावर मादक द्रव्यांशी संबंधीत मालाचे दोन कंटेनर गेले पंधरा दिवस पडून आहेत त्या अनुषंगानेही काही नवीन दावे केले. त्यावर एनसीबीने किंवा डीआरआयने काहीच का कारवाई केली नाही असा सवालही त्यांनी केला. समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा नव्याने आरोप करताना त्यांनी म्हटले आहे की महागडे कपडे परिधान करण्याच्या बाबतीत त्यांनी मोदींनाही मागे टाकले आहे. वानखेडे यांचे बुट दोन लाख रूपये किंमतीचे असतात, त्यांची घड्याळे 25 ते 50 लाखांची असतात, त्यांचे शर्ट 60 ते 70 हजार रूपये किंमतीचे असतात आणि त्यांची पॅंट एक लाख रूपये किंमतीची असते.
एखाद्या इमानदार सरकारी अधिकारी आपल्या वेषभुषेवर इतका पैसा कसा खर्च करू शकतो असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांत वानखेडे यांनी आपल्या वेषभुषेवरच दहा कोटी रूपये खर्च केले आहेत असे त्यांचे म्हणणे होते.
वानखेडे यांनी किमान एक हजार कोटी रूपयांची वसुली केली आहे या आरोपांचा पुनरूच्चार त्यांनी केला. एका प्रकरणात सिनेसृष्टीतील श्रद्धा कपूरसह अनेक नामवंत अभिनेत्यांना एनसीबीने एका प्रकरणात आपल्या कार्यालयांमध्ये बोलावून घेतले होते. त्या प्रकरणात गेल्या चौदा महिन्यात आरोपपत्र किंवा गुन्हा का दाखल झालेला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.