बारामती – आम्ही नाही ती अंडी उबविली आणि त्याचं पुढे काय झालं हे सर्वांना माहीत आहे. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयातच्या आवारात उभारलेल्या ‘अटल इनक्यूबेशन सेंटर’च्या अत्याधुनिक इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राजकारणात देखील अशा प्रकारच्या सेंटरची निर्मिती करावी लागते. याला उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीदेखील ते वीस वर्षांपूर्वी सुरू केले होते. त्यात आम्ही देखील नाही ती अंडी उबवली, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली.
पवार कुटुंबीय हे विकासाच्या ध्यासात रमलंय. फक्त विकासाचे काम करतात. राजकारणात टीकाकार असतात आणि असलेच पाहिजे. आम्हीसुद्धा तुमचे एकेकाळी टीकाकार होतो. राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले. पवार कुटुंब विकासात रंगल आहे. राजकारणात विघ्नसंतोषी खूप आहेत, ते असतातच, परंतु याकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामात गुंतुन ते तडीस नेणे आवश्यक आहे. ते काम पवार कुटुंबिय करत आहेत. राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही. राज्याचे नाव देशात व्हावे यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करेन, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
बॉम्ब फोडा पण धूर होऊ देऊ नका
दिवाळीनंतर बॉम्ब फोडतो म्हणणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवत टोला लगावला आहे. बॉम्ब फोडा पण धूर काढू नका कारण कोरोना अजून गेला नाही अस म्हणत त्यांनी सोमय्यांची खिल्ली उडवली.