वेल्हे-वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम खानू बंडेवस्तीला रखडलेल्या विकास कामांसाठी आमदार फंडातून निधी मिळणार असल्याचे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.
खानू बंडेवस्तीला रस्ता, वीज या मुलभूत सुविधा आजतागायत पोहचल्या नाहीत. रस्ता नसल्याने आजारी रूग्ण अनेकवेळा दगावले सुद्धा आहेत. मैलोमैल पायपीट विद्यार्थ्यांना व नागरीकांना करावी लागते. वीजेचा खांबही पोहचला नसल्याने खानू गाव अंधारातच चाचपटत आहे. यावर वेळोवेळी सरपंच, गावकरी यांनी प्रशासनाला निवेदने देवूनही काही दखल घेतली गेली नव्हती. डोंगराच्या कुशीत वसलेल्या खानू गावाकडे निवडणुकीच्या काळातच पुढाऱ्यांचे पाऊल पडते. रविवारी (दि. 12) खानू टेकपोळेचे सरपंच व ग्रामस्थांनी भोर येथे आमदार थोपटेंच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांच्यासमोर खानू गावातील असुविधांचा पाढा वाचून गावाच्या विकास कामांसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा असा प्रस्ताव देण्यात आला.
या प्रस्तावात खानु, चांदरला जोडणार प्रमुख रस्ता डांबरी करण्याबाबत, लाइट, शाळेची ईमारत इत्यादी कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी प्रस्ताव स्विकारून आमदार संग्राम थोपटे म्हणाले खानू गावाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आहे. येणाऱ्या काही दिवसांत खानू ग्रामपंचायतीला भरघोस निधी आमदार फंडातून देईल, अशी उपस्थितांना ग्वाही देण्यात आली. यावेळी खानू टेकपोळे सरपंच संतोष कोकरे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ उपाध्यक्ष तुकाराम कोकरे, पोलीस पाटील विलास कोकरे, वरघड उपसरपंच शिवाजी भरेकर, राहुल शेंडकर, दिनकर भरेकर, सुरेश भरेकर उपस्थित होते.