पुणे -पेशवे दप्तरमधून अनेक कागदपत्रे आणि माहिती लोकांपर्यंत येत आहे. इतिहासाने झपाटलेली आणि इतिहास संशोधनाचा ध्यास घेतलेली व्यक्तिमत्वे 24 तास एकच विचार घेऊन यामध्ये कार्यरत आहेत. इतिहास संशोधन मंडळात मोडी लिपीतील कागदपत्रे मोठ्या संख्येने आहेत. तसेच पेशवे दप्तरात किल्ल्यांची कागदपत्रे माठ्या प्रमाणात आहेत. ती इतिहास संशोधकांच्या माध्यमातून पुस्तकांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचत असल्याचे मत इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी व्यक्त केले.
“श्रीमल्हार पब्लिकेशन’तर्फे राज मेमाणे लिखित “देवगिरीची लढाई-1763′ या पुस्तकाचे प्रकाशन श्री सिद्धीविनायक मंदिर, देवदेवेश्वर संस्थान सारसबाग येथील प्रांगणात झाले. यावेळी पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, पुरातत्व संधोधक डॉ. सचिन जोशी, चित्रपट निर्माते अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, सिनेअभिनेते रमेश परदेशी, विजय मिश्रा आदी उपस्थित होते. इतिहासप्रेमी आणि वाचकांच्या हस्ते यावेळी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कागदपत्रातून येणारी माहिती ही महत्वाची असते. त्यातून संवर्धन हा विषय देखील उलगडत जातो. कागदपत्रे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी केलेला अभ्यास यातून इतिहासातील नव्या जागा समजतात. राज मेमाणे यांच्या अभ्यासातून निर्माण झालेल्या पुस्तकाद्वारे अनेक जागा समोर आल्या आहेत, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. इतिहास संशोधक आणि लेखकांनी लिहिण्याच्या आणि वाचकांनी वाचनाच्या रुपाने इतिहास जिवंत ठेवायला हवा, असे परदेशी म्हणाले.
राज मेमाणे म्हणाले, श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवा यांच्या एका शिक्क्याचा शोध घेण्यास पाच ते सहा हजार कागद तपासले. त्यात देवगिरी, नानासाहेब आणि भाऊंच्या नोंदी दिसल्या आणि माझा अभ्यास आणि शोध सुरू झाला. त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. इतिहास संशोधन हे वस्तुनिष्ठ पद्धतीने व्हायला हवे. त्यासाठी धर्म, जात मधे येता कामा नये. आज इतिहासाचा वापर समाजात तेढ वाढवण्यासाठी होत असून हे दुर्देवी असल्याची खंत मेमाणे यांनी व्यक्त केली.
पेशवा, अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले. अंकुर काणे यांनी सूत्रसंचालन केले.
पुस्तकात रंजक माहिती
देवगिरीवर मराठ्यांचा अंमल 17 वर्षे होता. त्या सगळ्या वर्षांचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. शिवाय 500 मराठे विरुद्ध दहा हजार मुघल या अप्रकाशित लढाईची रंजक माहिती या पुस्तकात आहे.