सोमाटणे, (वार्ताहर) – आपल्या वाट्याला काय हवे आहे, याचा विचार करून दुखी होण्यापेक्षा वाट्याला आलेले किती चांगले आहे. त्याला अजून चांगले कसे करता येईल यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच जर चांगली गोष्ट करायची असेल तर प्रथम स्वार्थाचा त्याग करा. चांगले आपोआप होईल, असे प्रतिपादन हभप पंकज महाराज गावडे यांनी शंकरवाडी येथे केले.
महाशिवरात्रीनिमित्त घोरावडेश्वर येथे अखंड हरीनाम सप्ताहात कीर्तन करताना ते बोलत होते. शेलारवाडी येथे घोरावडेश्वर साप्ताह समितीच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, संजोग वाघिरे, गणेश खांडगे, संतोष भेगडे, राजेश मुऱ्हे, रघुवीर शेलार, साप्ताह समितीचे अध्यक्ष रघुवीर शेलार आदी उपस्थित होते. शिवरात्रीनिमित्त घोरावडेश्वर येथे अध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
झाले राम राज्य आता काय उणे आम्हासी, या अभंगावर हभप पंकज महाराज गावडे यांनी विवेचन केले. ते म्हणाले की, एखादा महापुरुष किंवा देव जन्माला आल्यावर चांगले राज्य घडायला सुरुवात होत नाही. तर त्याच्या जन्मापूर्वीच चांगले घडायला सुरुवात होत असते. राम नामस्मरणात शक्ती आहे. ते हजारो वर्ष आपल्या हृदयावर ठाण मांडून आहेत. छत्रपती शिवाजी महराज जन्माला आल्यावर स्वराज्य घडले नाही, तर त्यांच्या जन्माच्या पूर्वीच जिजाऊंच्या मनात स्वराज्य निर्माण झाले होते. महाराजांनी ते प्रत्यक्षात उतरवले.