पंढरपूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हस्ते आज सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. यंदाच्या या पूजेसाठी मराठा समाज आणि कोळी समाजाच्या प्रचंड विरोधानंतर अखेर त्यांना या पूजेचा मान मिळाला.
यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला गावच्या बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दाम्पत्याला फडणवीसांसोबत शासकीय पुजेचा मान मिळाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुराया चरणी महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद आम्हाला मिळो, असं साकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुराया चरणी घातले आहे.
यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील त्यांच्या हस्ते आषाढीला विठ्ठल मंदिरात महापूजा झाली होती. तर, दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर शहराच्या विकासाचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. तसेच दिलेल्या आश्वासनांनुसारच कामं सुरु असून, ती पूर्ण होणार असल्याची हमी त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र धर्म हा वारकऱ्यांनी जिवंत ठेवला. माणसं बदलली तरी श्रद्धा बदललेली नाही, विकास आराखडा आपण केला आहे, आधी मंदिराचं संवर्धनाचं काम पाहिजे, अशी आपली भूमिका होती. 75 कोटी रुपयांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज झालं आहे. पुरातत्व विभागाला मला सांगणं आहे की, कोट्यावधी लोकांच्या भावना यासोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे हे काम उत्तम आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. पंढरपूर विकास आराखडा हा सर्वांना सोबत घेऊन करायचे आहे.”
“कोणाला विस्थापित करायचा आमचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाव नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आमची वारी ही आता आमची वारी राहिली नाही, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली आहे. त्यामुळे इथे व्यवस्था देखील त्याच पद्धतीनं उपलब्ध असली पाहिजे. इंद्रायणी स्वच्छ आणि अविरत वाहिली पाहिजे, यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी वेळ लागेल मात्र आपण सुरुवात केली आहे. इंद्रायणीमध्ये सोडलं जाणारं पाणी हे स्वच्छ करूनच त्यामध्ये गेले पाहिजे, यासाठी प्रयत्न आपण सुरू केले आहेत. पंढरपूरचं बदललेलं स्वरूप पाहण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होईल”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे, हेच विठुरायाकडे मागणं – फडणवीस
“महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे, हेच विठुरायाकडे मागणं आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवरती मोठं संकट आहे. शेतकऱ्याला समाधान देण्याची शक्ती विठुरायानं आम्हाला द्यावी. राज्यात आज अनेक समाजाचे प्रश्न आहेत. मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी, आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये सर्वांसाठी प्रार्थना मागितली, त्याच पद्धतीनं विठुराया चरणी मी मागणं मागतो की, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी,” असं साकड फडणवीसांनी विठुरायाकडे घातलं.
दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून सुमारे चार ते पाच लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. चंद्रभागा स्नानासाठी चंद्रभागेचा तीर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.