राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – हरिश्चंद्र या पुराण कथेला आधुनिकतेची साथ देऊन लेखिकेने तिला वाचनीय केले आहे. असत्य, दांभिकपणा यांचे कितीही अवडंबर माजवले तरी विजय हा सत्याचाच होतो. हे कादंबरी अधोरेखित करते. समाजामध्ये नीतिमूल्य ढासळत असताना सांस्कृतिक मूल्यांचा पुरस्कार ही कादंबरी करते. आशावादी भूमिका ही कादंबरीच्या लेखनातील महत्त्वाची बाजू आहे. जिवंत व्यक्तिरेखा, भाषा सौंदर्य आणि कलात्मक पद्धतीने केलेली प्रसंग वर्णने ही या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे, असे गारवोद्गार 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
राजगुरुनगर येथील लेखिका, कवयित्री मीनाक्षी डफळ-पाटोळे यांच्या ’हरिश्चंद्र’ या कादंबरीचे प्रकाशन अध्यात्म गुरु डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते व 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकले, साहित्यिक डॉ. शांताराम डफळ, डॉ. नीलम गायकवाड, प्रा. स्वप्नाली भुजबळ, लेखक मनोहर मोहरे मयुरी भवारी, नवनाथ डफळ, अॅड. माणिक पाटोळे यांच्यसह खेड तालुक्यातील राजकीय सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शब्दप्रभू ही उपाधी देऊन डॉ. नारायण महाराज जाधव यांनी लेखिकेचे कौतुक केले व अनेक आशीर्वाद दिले. कादंबरी लेखन करताना लेखकाला अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. कष्ट घ्यावे लागतात. वाचकांनी कादंबरी विकत घेऊन ती वाचावी असे आवाहन प्रा दिगंबर ढोकले यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखिका मीनाक्षी डफळ पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांनी केले. नवनाथ डफळ यांनी आभार मानले