प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 – कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने 26 ऑगस्टला टोलमाफीची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेनंतरही वाहनांवरील “फास्टॅग’द्वारे टोल वसूली झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारची घोषणा फसवी असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यासाठी गणेशभक्तांनी स्थानिक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्याकडे जाऊन मोफत टोल पास घ्यावेत, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागरिकांनी असे पास घेतले. मात्र, टोलमाफीचे पास घेऊन देखील भाविकांच्या गाडीवर असलेल्या “फास्टॅग’द्वारे टोलचे पैसे वसूल झाले आहेत.
पुणे-बंगळुरू महामार्गावर सर्वाधिक प्रमाणात हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत तक्रार करायची कुठे? हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे. हे पैसे जाताना कमी झाले पण, येताना देखील असाच भुर्दंड पडणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
21,871 जणांकडून पासचा वापर…
पुण्यातून कोकणात जाणारे बहुतांश हे पुणे सातारा मार्गानेच जातात. या मार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर 27 ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबरपर्यंत 21 हजार 871 जणांनी मोफत टोल पासचा वापर केला आहे. त्यांना टोलमधून माफी मिळाली आहे. टोल माफीचे पास हे खासगी बस, ट्रक, कार यांना देण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात खासगी बसनी देखील मोफत टोल पासचा फायदा घेतला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.