पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मावळ, पुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून ७ हजार १० मतदान केंद्रनिहाय जनजागृती गट स्थापन करून सक्रीय करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात मतदान केंद्रांवर स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय जनजागृती गटांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील व नेहरू युवा केंद्रातील विद्यार्थी, नागरी समाज संघटना तसेच समाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
या गटांच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मतदान केंद्राची पाहणी करून मतदान केंद्रनिहाय नावनोंदणी असणाऱ्या मतदारांच्या याद्यांचे त्यांच्यासमोर वाचन करण्यात येत आहे. मतदान केंद्रावरील मतदारांच्या अंगणवाडी सेविका, शिक्षक, नियुक्त कर्मचारी व स्वयंसेवक यांच्या मदतीने गृहभेटी देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
याविषयी माहिती देताना स्वीप समन्वय तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी सांगितले की, मतदारांची टक्केवारी कमी असण्याची कारणे शोधून मतदानाची टक्केवारी सुधारण्यासाठी या मतदान केंद्रनिहाय जनजागृती गटांद्वारे मेळावे, व्याख्याने, प्रभात फेरी, सायकल रॅली, विविध स्पर्धांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नवयुवा मतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार यांच्याकरिता केंद्रनिहाय जनजागृती गटांद्वारे विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.