पुणे – “जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र’ आणि “एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यात 740 बेरोजगारांना जागेवरच नोकरी मिळाली. तब्बल 3 हजार 261 पदांसाठी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 31 उद्योजक तथा कंपन्यांनी सहभाग घेतल्या होता. एकूण 1 हजार 364 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास दै.” प्रभात’ माध्यम प्रायोजक होते.
कर्वे रस्त्यावरील “एसएनडीटी’ कॉलेज ऑफ होम सायन्स येथील संकुलात शुक्रवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्याचे उद्घाटन “एसएनडीटी’ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त अनुपमा पवार, दै. “प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजोपयोगी रोजगार मेळाव्याचे उपक्रमाचे कौतुक करीत डॉ. मगरे म्हणाले, “उद्योजकांना सर्वंकष उमेदवार मिळतीलच असे नाही. मात्र नव्या उमेदवारांना नोकरीची संधी द्यायला हवी. विद्यापीठातून विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करण्याचा आणि जीवन कस जगावं हे शिक्षण पद्धतीद्वारे देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, प्रत्यक्षात नोकरी प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.’
कमी मनुष्यबळात रोजगार मेळावा यशस्वी झाल्याचे सांगत अनुपमा पवार म्हणाल्या, “एनएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या सहकार्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी हा मेळावा होत आहे. बेरोजगारांची संख्या खूप आहे. या मेळाव्याद्वारे रोजगारांची संधी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ज्या पदांसाठी फार शैक्षणिक पात्रता लागत नाही, अशा ठिकाणी जागीच उमेदवारांची निवड करा. त्यातून सकारात्मक संदेश समाजात जाईल. या प्रकारच्या शासनाच्या उपक्रमात काही त्रुटी अथवा सुधारणा आवश्यक असतील, तर त्याही सूचवा. मात्र, रोजगार मेळाव्यातून विश्लेषणात्मक अभ्यास व्हायला हवा.’
अविनाश भट म्हणाले, “एसएनडीटी’ने स्त्युत्य उपक्रम आयोजिला आहे. यशस्वी होण्यासाठी संधी व नशिब याचे प्रमाण एक टक्के असते. परंतु, प्रयत्न मात्र 99 टक्के करावे लागतात. त्यामुळे उमेदवारांनी प्रयत्नवादी असणे खूप महत्त्वाचे आहे.
प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी म्हणाल्या, एसएनडीटी विद्यापीठाची भूमिका ही नेहमीच समाजाभिमूख राहिली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाजात बदल घडवायचे असेल तर एक पाऊल पुढे टाकावे लागते. त्याच उद्देशाने रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. मागील वर्षीच्या मेळाव्यात 2 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातून 1 हजार 43 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यातून 673 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली. यावर्षी मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद
महाविद्यालयाने मेळाव्यासाठी उद्योजक व उमेदवार यांची योग्य व्यवस्था केली होती. तसेच उमेदवारांच्या माहितीसाठी ठिकठिकाणी सूचनाफलक होते. त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखती देणे शक्य झाले. यावेळी काही उमेदवारांची प्राथमिक टप्प्यात निवड झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे जाणवत होता.
दै. “प्रभात’ने नेहमीच “एसएनडीटी’ विद्यापीठास सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. यावर्षी जास्त शैक्षणिक अर्हता असलेल्या पदांची संख्या होती. त्याच तोडीचे उमेदवार निवडले गेले. त्यामुळे उद्योजकांनीही गुणवत्तापूर्वक उमेदवार मिळाल्याचे नमूद केले आहे. सर्वांच्या सहकार्यातून हा मेळावा यशस्वी झाल्याचा आनंद आहे.
– डॉ. मुक्तजा मठकरी, प्राचार्य