Maratha Reservation – मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) अल्टिमेटमनंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मोर्चाचे वादळ मुंबईवर धडकण्याआधीच राज्य सरकारकडून पडद्यामागे बऱ्याच हालचालींना सुरुवात झाली.
मनोज जरांगे यांना रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्याशी पडद्याआडून चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री (Eknath Shinde) स्वतः जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावे लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापुढे आता आव्हान आहे ते मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचे. जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेबाबत एकनाथ शिंदे स्वत: पडद्यामागच्या चर्चेत सहभागी होत आहे. राज्य सरकार सध्या आरक्षणासाठी काय काय प्रयत्न करतेय हे त्यांना पटवून देण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून बच्चू कडू, उदय सामंत तर भाजपकडून गिरीश महाजन हे मनोज जरांगे यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. या विषयावर मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलवणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मराठा आरक्षणाकरता प्रशासकिय पातळीवर सरकारची काय प्रगती आहे याचा आढावा घेण्याकरता एक विशेष बैठक स्वतः मुख्यमंत्री लवकरच सह्याद्री अतिथी गृहात बोलवणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून मराठा समाजाला सरकार काय काय प्रयत्न करत आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न असेल.
अधिकाऱ्यांना दिलेली कामे होत आहेत की नाही, राज्य सरकार आरक्षणाच्या दिशेने जात आहे की नाही, विशेष अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे घेतले जातील अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होईल आणि मराठा आरक्षणासंदर्भात तापलेलं वातावरणात दिलासा देण्याचा एक प्रयत्न केला जाईल.