ऐन परीक्षांच्या काळात महावितरणचे होतेय दुर्लक्ष : वारंवार तक्रारी करूनही उपयोग नाही
वडगावशेरी : प्रभाग क्रमांक 3 मधील विमाननगरमधील म्हाडा सोसायटी परिसरात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार गेले चार ते पाच दिवसांपासून सुरू असून ऐन बारावी परीक्षेच्या काळातच महावितरणकडून अशाप्रकारे विजेचा खेळखंडोबा होत सुरु असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
म्हाडा कॉलनी परिसरात दुपारच्या वेळी आणि सायंकाळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. याविषयी वारंवार तक्रारी महावितरण विभागला देण्यात आल्या आहेत तरी देखील म्हाडा कॉलनीला दुय्यम स्थान दिल्या सारखे महावितरण सतत दुर्लक्ष करत आहे. असा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्याचा काळ हा परिक्षेचा काळ आहे. इतरवेळी सुद्धा असे प्रकार वारंवार होत असतात पण सध्या तरी परीक्षेचा काळ आहे याकाळात तरी विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळू नका. पहाटे किंवा रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करण्याची पाळी आली आहे. या शिवाय सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाडा सुरु झाला आहे. साहजिकच उकाड्याने हैराण होत असल्याने नागरिकांना फॅनची जास्त गरज भासत आहे.त्याचवेळी नेमका विद्युत पुरवठा खंडीत झालेला असतो.
परीक्षेच्या कालखंडात विद्युत पुरवठा खंडित होणे हेच विद्युत विभागाच्या कामाचा नाकर्तेपणा आहे.आमची सरळ भूमिका आहे विद्युत विभागाकडून परीक्षा कालखंडात विद्युत पुरवठा खंडीत झाला तर आमच्या स्टाईलने महावितरण विभागाला उत्तर देऊ विद्यार्थ्यच्या भवितव्याशी खेळ करत असेन तर महावितरण विभागाला उत्तर द्यावे लागेल. असा इशारा मनविसे चे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला आहे.