भाकरी मिळणे महत्त्वाचे
नवी दिल्ली, दि. 16 – सार्वत्रिक निवडणुका 1978 पर्यंत पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयास जनतेचा जोरदार पाठिंबा आहे, असे समाचार वृत्तसंस्थेने घेतलेल्या राष्ट्रव्यापी पाहणीवरून दिसून आले आहे. विविध क्षेत्रातील, थरातील शेकडो स्त्री-पुरुषांच्या मुलाखती देशाच्या विविध भागात घेतल्या.
त्यात असे दिसले की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व बिकानेरपासून शिलॉंगपर्यंत बहुसंख्य लोकांचा निवडणुका पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयास पाठिंबा आहे. सर्वसामान्य लोकांना निवडणुकीचे प्रश्न महत्त्वाचे नसून भाकरी मिळणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
पूर्व किनाऱ्यावर बॉक्साइटचे मोठे साठे
मद्रास – भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बॉक्साइट या खनिजाचे फार मोठे साठे असल्याचे, भूगर्भशास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. दक्षिण भागातील या पाहणीचे उपसंचालक डॉ. एम. व्ही. एम. मूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.
धान्य साठविण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ
नवी दिल्ली – पुढील एप्रिलपर्यंत देशात 2.15 कोटी टन अन्नधान्य साठविण्याची व्यवस्था झालेली असेल, असे अन्न महामंडळाने सांगितले. सध्या 1.7 कोटी टन अन्नधान्य साठविण्याची क्षमता आहे.