नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी व्हावे यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र एकूणच कांद्याचे उत्पादन गरजेपेक्षा कमी झाल्यामुळे कांद्याचे दर अजूनही 60 रुपये प्रति किलो या पातळीवर आहेत. या संदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, काही शहरात कांद्याचे दर 80 रुपये प्रति किलो या पातळीपर्यंत आहेत. जोपर्यंत खरिपातील पूर्ण कांदा बाजारपेठेत येत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर कमी होणार नाहीत असे समजले जात आहे.
देशात तयार झालेला कांदा देशातच उपलब्ध व्हावा याकरिता केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात कांद्याचे किमान निर्यात मूल्य 800 डॉलर प्रति टन इतके केले आहे. 25 ऑक्टोबर पासून कांद्याच्या दरात वाढ होत आहे. भारतात कांदा खरिपात आणि रब्बीत घेतला जाता.े काही प्रमाणात उशिरा खरिपातही कांद्याची लागवड केली जाते. हा उशिरा लावलेला कांदा अजून बाजारात आलेला नाही.
खरिपात लावलेला कांदा बाजारात लवकर उपलब्ध करावा लागतो. कारण तो लवकर खराब होतो. मात्र रब्बीमध्ये लावलेला कांदा दीर्घ काळ टिकतो. आता रब्बीची लागवड सुरू झाली आहे. खरिपाच्या वेळी महाराष्ट्रात विषम पर्जन्यमान झाले. त्याचा महाराष्ट्रातील लागवडीवर परिणाम झाला. कांद्याचे उत्पादन जास्त घेणाऱ्या राज्यापैकी महाराष्ट्र हे राज्य आहे. मुळात महाराष्ट्रातच कांद्याचे उत्पादन बरेच कमी झाल्यामुळे कांद्याच्या किमती जास्त आहेत. त्या दीर्घकाळ जास्त पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बटाटा, टॉमॅटो स्थिर
राष्ट्रीय पातळीवर बटाट्याचे दर सध्या 26 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर आहेत, तर टोमॅटोचे दर 39 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर आहेत. कांदा बटाटा आणि भाज्याचे दर स्थिर पातळीवर राहण्यास अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत काही वस्तूचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार राखीव साठा करते. त्यामध्ये कांद्याचा समावेश आहे.