कराड – अमृतसर (पंजाब) येथे महाराष्ट्रातील सोन्याचे दागिने बनविणारे कारागीर आपल्या परिवारासह अडकून राहिले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी साताराचे खा. श्रीनिवास पाटील यांनी महाराष्ट्रातील पंजाबमध्ये असणारे आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील यांच्याशी समन्वय साधत केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
त्यामुळे पंजाबमध्ये अडकलेल्या शेकडो गलाई कामगारांना येत्या दोन दिवसात आपल्या मायभूमीत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर गलाई व्यवसायिकांसाठी खा. पाटील हे देवदूत ठरल्याची भावना कारागिरांमधून व्यक्त होत आहे. पंजाबमधील अमृतसर आणि परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले महाराष्ट्रातील शेकडो नागरिक लॉकडाऊन परिस्थितीमुळे तेथेच अडकून राहिले आहेत.
करोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने या कारागिरांना आर्थिक समस्यांसह इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रारंभी सुमारे चारशे कामगार आणि त्यांचा परिवार महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. त्यातील काही नागरिकांनी खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती. खा. पाटील यांनी पंजाब पोलीस दलात कार्यरत असलेले केतन पाटील यांच्याशी संपर्क साधून सुरूवातीला एसटी बसने कामगारांच्या परतीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तसेच सांगलीच्या कामगारांची संख्या जादा असल्याने पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
खा. श्रीनिवास पाटील यांनी अमृतसर व सांगलीचे आयएएस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत केंद्राकडे पाठपुरावा करून मदतीची चक्रे वेगाने फिरविली. रेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजूरी दिली असून अमृतसर ते सांगली आणि अमृतसर ते मुंबई अशा दोन रेल्वे टप्प्याने सुटणार आहेत. त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.