नवी दिल्ली – देशाबरोबरच 46 वा नागरी लेखा दिवस 2 मार्च रोजी नवी दिल्ली येथे जनपथावरील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी व्यवसाय सुलभता आणि डिजिटल इंडिया व्यवस्थेचा एक भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक बिल( ई-बिल) प्रक्रिया प्रणाली या सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमाचा प्रारंभ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात येईल.
अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार ई- बिल प्रणाली केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये लागू करण्यात येईल. पारदर्शकता, कार्यक्षमता यात वाढ करण्यासाठी आणि ओळखरहित- कागदरहित प्रणालीसाठी हे पुढचे पाऊल आहे. आता पुरवठादार आणि कंत्राटदार त्यांचे दावे ऑनलाईन जमा करू शकतील आणि त्याबाबतची प्रक्रिया रियल टाईम म्हणजेच त्याच क्षणी पाहता येईल.
प्रकल्प व्यवस्थापन आणि प्रकल्प खरेदी संदर्भात सामान्य मार्गदर्शक सूचना याबाबत अर्थमंत्रालयाच्या खरेदी धोरण विभागाचे सल्लागार संजय अग्रवाल यांच्याकडून सादरीकरण करण्यात येईल. पीएफएमएस( पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम) चा विकास आणि व्यवस्थापन यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावरही यात भर असेल.
पीएमएमएस हा एक एकीकृत आयटी प्लॅटफॉर्म असून त्याच्या माध्यमातून डीबीटीसह, नॉन टॅक्स रिसिट आणि आणि लेखाविषयक कामे केली जातात. या प्रणालीमुळे नागरी लेखा संघटना कोविड काळातही सरकारी व्यवहार सुरळीत ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकली. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था शाश्वत राखण्यासाठी आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी आणि तिची वृद्धी करण्यासाठी पेमेंट आणि रिसीटचे कार्य सुलभतेने सुरू राहणे गरजेचे आहे.