चंदीगड – भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवार (दि.4) पासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यातून भारतीय क्रिकेट एका नव्या युगात प्रवेश करेल. या सामन्यातून 34 वर्षीय रोहित शर्मा पहिल्या कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. तर 33 वर्षीय विराट कोहली 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच केवळ फलंदाज म्हणून कसोटी सामना खेळताना दिसेल.
यामुळे हा सामना जितका रोहितसाठी तितकाच विराटसाठीही खास आहे. कारण हा विराटचा कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना असेल. या विशेष सामन्यात शतक ठोकत विराट स्वतःला पुन्हा सिद्ध करू शकतो. विराटने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथील दिवस-रात्र कसोटी सामन्यात मारले होते. त्यानंतर त्याने 15 कसोटी सामन्यांतील 27 डावात फलंदाजी केली असून यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकही शतकी खेळी निघालेली नाही.
मात्र, मोहालीत विराटला अद्याप एकही शतक करता आलेले नाही. त्याने या मैदानावर आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतकांच्या मदतीने 49.75 च्या सरासरीने 199 धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद 67 धावा इतकी राहिली आहे.
विराटला विक्रमी खेळीची संधी
विराटपूर्वी 100 कसोटी सामने खेळण्याची करामत करणारे पहिले खेळाडू इंग्लंडचे माजी दिग्गज कॉलिन काउड्रे हे होते. त्यांनी जुलै 1968 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेदरम्यान बर्मिगहॅम कसोटीत हा पराक्रम आपल्या नावे नोंदवला होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्यांनी 104 धावाही जोडल्या होत्या. अशाप्रकारे ते केवळ 100वा कसोटी सामना खेळणारे जगातील पहिले खेळाडूच नव्हे, तर ते 100व्या कसोटीत शतक ठोकणारेही पहिलेच फलंदाज ठरले होते. त्यांच्यानंतर आतापर्यंत फक्त 9 खेळाडू शतकी कसोटी सामन्यात शतक करू शकले आहेत. परंतु या 9 खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचे नाव नाही. यामुळे विराट ही विक्रमी खेळी करण्याची संधी आहे.