नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या संबंधात त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना एक विस्तृत पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची कारणे विशद केली आहेत. त्यात त्यांनी पक्षाचा कारभार सध्या एका चौकडीच्या हातात गेल्याचा आरोप केला असून पक्षाच्या निवडणुकांची प्रक्रियाही गैरपद्धतीने राबवली गेल्याचे म्हटले आहे.
2014 साली झालेल्या काॅंग्रेसच्या पराभवाला राहुल गांधीच जबाबदार होते – गुलाम नबी आझाद
गेली 50 वर्ष गुलामनबी आझाद कॉंग्रेसमध्ये कार्यरत होते त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांना पुन्हा राज्यसभेवर नियुक्ती अपेक्षित होती. ती न करता त्यांना जम्मू काश्मीर मध्ये काम करण्यासाठी पक्षाकडून सुचवण्यात आल्याने ते नाराज होते अशी माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. तथापि कॉंग्रेसच्या अधिकृत प्रतिक्रीयेत मात्र आझाद यांचा निर्णय दुर्देवी आहे असे म्हटले आहे.
अलीकडच्या काळात कपिल सिब्बल आणि अश्वनी कुमार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसशी फारकत घेतली आहे. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनीही हिमाचलातील आपल्या जबाबदारीचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आझाद यांनी दिलेल्या राजीनाम्याला महत्व दिले जात आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची पुढील रणनिती ठरली?
आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, कॉंग्रेसने किरकोळ लोकांना पक्षात महत्व दिले आहे. त्यामुळे या पक्षाने स्वत:हून भाजपला राष्ट्रीय पातळीवर व प्रादेशिक पक्षांना राज्य पातळीवर जागा मिळवून दिली आहे. गेल्या आठ वर्षात हा प्रकार घडला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने आता राजकीयदृष्ट्या आपली इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्हीही गमावले आहे आणि यातून पक्षाला उभारी मिळण्याची कोणतीही शक्यता राहिलेली नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अत्यंत जड अंतकरणाने मला गेल्या पाच दशकांपासून असलेली पक्षाची साथ सोडावी लागत आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
देशातील सर्व टोलनाके होणार हद्दपार – नितीन गडकरी
पक्षात सध्या जी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली आहे ती पुर्ण लबाडीची आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. ते म्हणाले की पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जी मतदार यादी तयार केली गेली आहे त्यासाठी देशभरात कोणत्याही पातळीवर निवडणूक घेण्यात आलेली नाही. पक्ष मुख्यालयातील चौकडीने तेथे बसून या बनावट मतदार याद्या तयार केल्या आहेत. बूथ, ब्लॉक, जिल्हा किंवा राज्यात कोणत्याही ठिकाणी मतदार यादी प्रकाशित करण्यात आली नव्हती असेही त्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू करण्यापुर्वी कॉंग्रेस जोडो यात्रा काढायला हवी होती अशी उपरोधिक सूचनाही आझाद यांनी यावेळी केली आहे.