जुनी गंगेमुळे धोका टळला
बसस्थानक मोकळे
पुरामुळे कोपरगाव आगारातील एसटीच्या फेऱ्या होऊ शकल्या नाहीत. पुरामुळे तब्बल 75 बस आगारांमध्ये उभ्या होत्या.त्यांच्या 455 फेऱ्या थांबवण्यात आल्या. बाहेरगावी लांब पल्ल्याच्या गेलेल्या 13 गाड्या अडकून होत्या. बसस्थानकामध्ये सर्वत्र शुकशुकाट होता.पुरामध्ये वृद्ध वाहून गेल्याची भीती
तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सूर्यभान जानकु पानगव्हाणे वय 70 वर्ष हे रविवारी सायंकाळी गोदावरी नदीपात्रातून पूजेसाठी पाणी आणण्यासाठी गेले असता ते पुन्हा घरी परत आले नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले सूर्यभान पानगव्हाणे गोदावरीच्या पुरामध्ये वाहून गेल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला असून त्यांचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे.
कोपरगाव – नांदूरमधमेश्वर धरणातून रविवारी रात्री 2 लाख 91 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने गोदावरीने रुद्रावतार धारण करीत पूररेषा ओलांडून कोपरगाव शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. शहराजवळील बेट भागातील जुनी गंगा येथून गोदावरी नदीपात्रात असलेल्या पुराचे पाणी वाहत गेल्यामुळे शहरांमध्ये घुसणारे पुराचे पाणी कमी होत गेले.
सन 2006 पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग नदी पात्रात असताना जुनी गंगेच्या पुलाखालून वेगळा पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पुराच्या पाण्याची तीव्रता कमी झाली. आताही हे झाल्याने जुन्या गंगेमुळे कोपरगावकरांचे संकट टळले. नाशिक जिल्ह्यातील धरण परिक्षेत्रमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सोडण्यात आले. जलसंपदा विभागाने नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रामध्ये दोन लाख 91 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सोडला होता. या पाण्यामुळे नदीकाठच्या 36 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. गोदावरी नदीमध्ये सोडलेले हे पाणी महापुराच्या स्थितीमध्ये येण्याची शक्यता दाट होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हे पाणी कोपरगाव शहरामध्ये घुसण्यास सुरुवात केले. शहरातील खंदकनाला बसस्थानक, मुख्य रस्ता, सप्तऋषी मळा, काले मळा, गजानननगर, 105, लिंबाळा मैदान, हनुमाननगर, बैलबाजार रोड, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, बेट भाग आदी ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले.
पाच फुटापर्यंत पाण्याची पातळी शहराच्या मुख्य रस्त्यासह काही उपनगरांमध्ये घुसल्याने महापूर स्थिती होते की काय असे वाटत होते. मुख्य बाजारपेठेतील व्यापारी हवालदिल झाले होते. शहराच्या चहुबाजूने पाण्याचा वेढा सुरू झाला होता. नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असताना शहरातील जुनी गंगा येथून स्वतंत्र पाण्याचा विसर्ग नदीपात्रातून होऊ लागला. त्यातच नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग हळूहळू कमी होत गेला. त्यामुळे महापुराच्या संकटातून कोपरगावकरांची सुटका झाली.
सोमवारी पहाटे शहरात पाणी घुसल्याने शहराच्या मुख्य रस्त्यावरती पाणीच पाणी झाल्याने रहदारीचा मुख्य मार्ग बंद पडला होता. सोमवारी हा कोपरगावचा आठवडे बाजार असल्याने अनेक भाजीविक्रेते जनावरे विक्रेते रस्त्यावर ती विक्री करण्यास सुरुवात केल्याने इतर रस्त्यावरती वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शहरातील उपनगरांना जोडणारा रस्ता म्हणून गोकुळनगरी मार्ग हा एकमेव मार्ग शहरात जाण्यासाठी खुला होता. शहरामध्ये जाण्याचा मुख्य मार्ग बंद झाल्याने एका भागाचा संपर्क तुटला होता. गोकुळनगरीच्या छोट्या फुलावरून शहरांमध्ये जाण्यासाठी एकमेव रस्ता शिल्लक राहिला होता.
काही वेळानंतर तोही रस्ता हळूहळू जलमय झाला. मात्र दैनिक “प्रभात’ ने या पुलाच्या दुरावस्थेची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने पुलाचे काम पूर्ण केल्याने हा धोकादायक पुल पूर परिस्थितीमध्ये सुखदायी ठरला. महसूल विभाग, पोलीस, नगरपालिका, वनविभाग यांच्यावतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देऊन आपत्तीग्रस्त नागरिकांची त्यांच्या सामानासह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. कोपरगाव शहरासह तालुक्यातील कुंभारी, मंजूर, कोळगाव थडी, मुर्शतपुर, डाऊच बुद्रुक, मायगाव देवी, हिंगणी, जेऊर कुंभारी, वारी, कान्हेगाव, धारणगाव, चासनळी, मोर्विस कोकमठाण आदी गावातील पूरग्रस्त 329 कुटुंबातील 2 हजार 10 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. सोबतच 39 गाई, 3 वासरे, 29 शेळ्या, 5 बैल, 4 म्हशी 80 जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.
शासकीय यंत्रणेमार्फत पूरग्रस्तांना पूर येण्यापूर्वीच मदत व बचाव कार्य सुरू होते. स्थलांतरित कुटुंबांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था त्या-त्या गावातील शाळा महाविद्यालय, धर्मशाळा, कार्यालय आदी ठिकाणी करण्यात असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. गोदावरी नदीला पूर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे पुराचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी शहरासह नदी काठावरती गर्दी केली होती. दरम्यान रविवारी दिवसभर प्रशासनाच्यावतीने नदीकाठावरील नागरिकांनी पुरापासून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आल्याने कोपरगाव शहरासह नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आपली रात्र जागून काढली.
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास कोपरगाव शहरामध्ये पुराचे पाणी घुसले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोदावरी नदीचा परिसर जलमय झाला होता. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, प्रवीण लोखंडे, वन विभागाचे अधिकारी एस. एम. जाधव, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आपल्या संपूर्ण विभागाच्या कर्मचाऱ्यास रात्रभर जागुन काढली. दरम्यान सोमवारी दुपारनंतर पुराचे पाणी शहरातून ओसरत होते. सोमवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रातील पाणी हळूहळू कमी होत गेल्याने पूरस्थिती कमी झाली. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत 1 लाख 33 हजार क्युसेसवर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने पुराची तीव्रता कमी झाली आहे.