मुंबई: मुंबईतील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाचं काम २०२२ पर्यंत पूर्ण करणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१५ साली इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन केले होते. या स्मारकाचं काम कुठपर्यंत आलं आहे, काही अडचणी आहेत का हे समजून घेतले. आता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी स्मारकाबद्दल चर्चा करून लवकरच निर्णय घेणार, काही गोष्टींसाठी मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागेल. आणखी काही परवानग्या घ्यायच्या आहेत, मात्र त्या केंद्राच्या नसून राज्य सरकारच्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
तसेच स्मारकाच्या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मंत्रिमंडळासमोर सर्व गोष्टी मांडल्यानंतर दोन वर्षात स्मारक उभे करणार. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक परिसर हरित असेल, स्मारकाची इमारत ग्रीन बिल्डिंग असेल, असा संकल्प आहे. इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं जाईल, झाडं वाढवली जातील. प्रस्तावित प्लॅन बघितल्यानंतर याबाबत काही सूचना केल्या आहेत. स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या काही सूचना असतील तर त्या देखील विचारात घेऊ, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.