मुंबई – कांद्याच्या मुद्यावर कुणीही राजकारण करू नये. केंद्राने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. त्यामुळेच या प्रकरणी तातडीने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विरोधकांना कांद्याच्या प्रश्नावर राजकारण न करण्याचे आवाहन केले. तसेच, या प्रकरणी सरकारवर टीका करणाऱ्या शरद पवारांना त्यांनी ते 10 वर्षे देशाचे कृषिमंत्री होते, अशी आठवणही करून दिली.
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. कांदा खरेदीबाबत आमची केंद्र सरकारशी चर्चा झाली आहे. त्यानंतर इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केली जात आहे. केंद्राचा हा निर्णय शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारा आहे. सरकार सुमारे 10 लाख मेट्रीक टन कांदा साठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभारही मानले.
शिंदे पुढे बोलताना म्हणाले की,अनिल काकोडकर समितीच्या शिफारशीचे काम सुरू आहे. सरकारला उत्पादक आणि ग्राहकांचा विचार करावा लागतो. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाते. कांदा साठविण्यासाठी उपाययोजना करणार, कांद्यांच्या प्रश्नावर पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली असून कांद्याच्या नदानात वाढ करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कांदा महाबॅंक संकल्पना
कांद्याची साठवणूक वाढविण्यासाठी राज्यात कांदा महाबॅंक ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींवर काम सुरू आहे. राज्यात 13 ठिकाणी कृषि समृद्धी प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये रब्बी कांद्यासाठी दहा लाख टन इतकी साठवणूक क्षमता उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे 60 हजार पेक्षा जास्त रोजगार निर्माण होऊ शकतात, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितेल.
तर पुन्हा केंद्राची मदत घेणार
गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, अशी माहितीही शिंदेंनी यावेळी दिली. मी देखील अमित शहा आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारनं दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.