नवी दिल्ली : जगात करोनाचा परिणाम हळूहळू कमी होताना दिसत आहे. करोनाला रोखण्यासाठी बाजारात लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे.मात्र या सर्वात घाऊक प्रमाणात येत असलेल्या लसींची परिणामकारकतेविषयी मोठी चर्चा होताना दिसत आहे. लस कालांतराने प्रभावहीन ठरत असल्याचे नवीन धक्कादायक संशोधन समोर आले आहे.
अमेरिकी शास्त्रज्ञांनी डिसेंबर, २०२० ते ऑगस्ट, २०२१ या कालावधीत संपूर्ण लसीकरण झालेल्या आघाडीच्या कर्मचाऱ्यांची पाहणी केली. या लसवंत आघाडी कर्मचाऱ्यांमध्ये गत सर्वेक्षणाच्या तुलनेत लसीची परिणामकारकता ८० टक्केच भरली.
शास्त्रज्ञांनी जेव्हा पहिल्यांदा या लसवंतांचे सर्वेक्षण केेले होते त्यावेळी त्यांच्या शरीरात लसीची परिणामकारकता ९१ टक्के एवढी होती. दुसऱ्या सर्वेक्षणासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल ग्राह्य धरण्यात आले होते. लसीची परिणामकारता दोन्ही डोसनंतर घटत
जाते, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला.
शास्त्रज्ञांनी काढलेल्या या निष्कर्षांचा अहवाल मॉर्बिडिटी मोरॅलिटी या साप्ताहिकात सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (सीडीसी) यांच्याकडून प्रकाशित करण्यात आला.
ज्यांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही असे १९४ बाधित आढळून आले. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांच्यातील३४ लोकांना संसर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. लसीचा प्रभाव हळूहळू क्षीण होत जातो. दोन डोसनंतर शरीरात पुरेशा प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात. त्यांचा प्रभाव काही काळ राहतो. साधारणत: ५ महिन्यांनंतर लसीचा प्रभाव कमी होत जातो.