अनेकदा जाता येता कोणाला तरी चक्कर आल्याचे आपण बघतो. विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसात आणि अतिशय कडक ऊन असताना चक्कर येण्याचे प्रकार होतात. सामान्यत: चक्कर आल्यानंतर मस्तकावर पाणी टाकणे, कांदा फोडून नाकाला लावणे हा उपचार केला जातो, किंवा जात असे असे म्हणूया.
चक्कर येणे हे एक लक्षण आहे त्याची अनेक कारणे असू शकतात. साधी भूक दुर्लक्षित राहिली तरी चक्कर येऊ शकते. काही मानसिक ताणतणावामुळेही चक्कर येऊ शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे हे चक्कर येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. उन्हाळ्यात उन्हाळी लागणे, रक्तदाब पुष्कळ कमी होणे, शरीरातून कोणत्याही कारणाने खूप रक्तस्त्राव होणे, मेंदूस अचानक रक्तपुरवठा कमी वा बंद होणे अशा व यासदृश्य कारणांनी चक्कर येऊ शकते. एकाच जागेवर स्वतःभोवती गोल-गोल फिरल्यावर जशी भावना निर्माण होते, वा शरीराची स्थिती होते तसेच चक्कर आल्यानंतर वाटते. यालाच भोवळ येणे असेही म्हणतात. भोवळ आल्यावर मनुष्याच्या शरीराचे संतुलन बिघडते व तो खाली पडतो.क्वचित बेशुद्धावस्थेतही जातो. वेळीच उपचार न मिळाल्यास तो कोमात जाऊ शकतो वा मृत्युमुखीही पडु शकतो. ही, मानवी शरीराची आपत्कालीन स्थिती दूर करण्यास व त्यास सामान्य स्थितीत आणण्यासाठी शरीराने केलेली प्रतिक्रिया आहे असे समजतात.
चक्कर आली तर लगेच घाबरून जाऊन मला कुठला मेंदूचा विकार तर झालेला नाही ना, अशी शंका घेण्याची गरज नसते. मात्र वारंवार चक्कर येत असली, तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. चक्कर कोणत्या कारणामुळे आली हे समजल्याशिवाय तिच्यावर उपचार करण्याचा फायदा होत नाही. विशेषतः ज्येष्ठ वयाच्या व्यक्तींना किंवा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, अर्धांगवात अशा प्रदीर्घ विकारांचा इतिहास असणाऱ्यांना चक्कर आली तर लागलीच विशेष तपासण्यांचा आधार घेणे आवश्यक असते.
गरगरणे, घेरी येणे, भोवळ येणे, तोल गेल्यासारखे वाटणे, डोके हलके झाल्यासारखे वाटणे या प्रकारे चक्कर येण्याचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केले जाते. व्हर्टिगो या सर्वांच्या परिचयाच्या त्रासातही मुख्य लक्षण चक्कर येणे हेच असते. आयुर्वेदात चक्कर येणे या त्रासाला शिरोभ्रम असे म्हटलेले आढळते. चक्रस्थितस्येव संवेदनम् । असे भ्रमाचे स्पष्टीकरण केलेले आहे. अर्थात चक्रावर बसून फिरल्याचा भास ज्या विकारात होतो त्याला शिरोभ्रम म्हणतात. ऐंशी वातविकारांपैकी हा एक विकार सांगितला आहे. तसेच मज्जाधातूत बिघाड झाल्यामुळेही भ्रम होऊ शकतो, असे म्हटले आहे.
पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते.
रक्तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो.
मानसिक क्षोभामुळे, अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस चार चमचे व चमचाभर खडीसाखर असे मिश्रण घेता येते.
ऊन लागल्यामुळे चक्कर येत असली तर नाकात दुर्वांच्या रसाचे – थेंब टाकण्याचे तसेच टाळूवर आवळकाठीच्या चूर्णात पाणी मिसळून तयार केलेला लेप लावून ठेवण्याने बरे वाटते.
फार अशक्तपणा जाणवत असला व चक्कर येत असली, बरोबरीने तोंडाला चव नसली तर मनुका खाण्याचा उपयोग होतो. मनुका थोडेसे सैंधव लावून थोड्याशा तुपावर परतून घेतल्या व काही दिवस रोज खाल्ल्या तर गुण येतो.
कोणत्याही कारणाने शुक्रक्षय झाला असला (हस्तमैथुन, अतिमैथुन, स्वप्नदोष वगैरेमुळे) व त्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर येत असली तर रोज अर्ध्या नारळाचे ओले खोबरे वाटून त्यातून निघालेले दूध चवीनुसार साखर टाकून पिण्याचा उपयोग होतो.
ताप चढल्यामुळे चक्कर येत असली तर कपाळावर रिठ्याच्या पाण्याच्या घड्या ठेवण्याने बरे वाटते. यामुळे ताप उतरण्यासही मदत मिळते. बरोबरीने तापावर योग्य उपचार करणे आवश्यक होय. – डोक्यात सर्दी साठून म्हणजे डोके जड होऊन चक्कर येत असली तर सुंठीचे बारीक चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्याने बरे वाटते.