मुंबई – चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत. सध्या ते एक्स वाईफ अभिनेत्री कल्की कोचलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान कल्कीने अनुरागसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. तसेच अनेक अडचणींना सामोरी जावे लागले. त्याबाबत तिने खुलासा केला आहे.
कल्की म्हणाली की, “अनुरागसोबत घटस्फोट झाल्यानंतर मला यातून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागला. घटस्फोटानंतर पहिली काही वर्षे तिची आणि अनुरागचं संबंध फारसे काही चांगलं नव्हते. बराचकाळ माझे कोणीही मित्र नव्हते. माझ्यासोबत कोणीही फारसे बोलत नव्हते. या काळात मला विविध थेरपीही कराव्या लागल्या. मात्र आता घटस्फोट होऊन सात-आठ वर्षे झाली आहेत.”
दरम्यान, कल्कीने 2011 मध्ये चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केले. पण, 2015 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. कल्कीने 2009 मध्ये अनुराग कश्यपच्या ‘देव-डी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात अभय देओलही मुख्य भूमिकेत होता. याशिवाय कल्कीने 2010 मध्ये अनुरागसोबत ‘दॅट गर्ल इन येलो बूट्स’ आणि ‘सेक्रेड गेम्स सीझन 2’मध्येही काम केले होते. मात्र ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटामुळे कल्की प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या ती तिच्या ‘गोल्डफिश’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.