पुणे – “गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून अंगणवाडीतील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. यातून मुलांना जो आनंद मिळाला, हीच माझ्यासाठी मोठी भेट आहे. माझ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान मुले आली. त्यामुळे माझे व्यासपीठ आणखी सुंदर व भव्य केले आहे,’ असे प्रतिपादन मुनिश्री आचार्य श्री पुलकसागरजी महाराज यांनी केले.
पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील अंगणवाडीत शिकणाऱ्या सुमारे 650 पेक्षा जास्त बालकांना पाटी, पेन्सिल्स व गणवेषाचे वाटप रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनतर्फे करण्यात आले. यावेळी श्री पुलकसागरजी महाराज बोलत होते. तलासरी तालुक्यातील उपलाट येथे तीर्थधाम जिनशरणं येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर. एम. डी. फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारिवाल यांनीही भावना व्यक्त करत उपक्रमामागची संकल्पना स्पष्ट केली. याप्रसंगी बालविकास अधिकारी गणेश मांटे यांनी मुलांना गणवेशात पाहून खूप आनंद झाला, असे मत व्यक्त केले.
तर, गणवेशातून मुलांना एक शिस्त लागते, असे मत तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी व्यक्त केले. अंगणवाडी सेविका गीता जाना डबके यांनी गणवेश परिधान केलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल व आनंद दिसून येतो, असे मत व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी सेविकांना चाफ्याची झाडे वितरीत करण्यात आली. तर, उपस्थितांसाठी गौतमीप्रसाद कार्यक्रम यावेळी आयोजित केला होता.
शहरातील नर्सरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशातच शाळेत जावे लागते. मात्र, आदिवासी क्षेत्रातील मुलांना गणवेश ही संकल्पनाच माहिती नाही किंवा तशी सोयही नाही. मुलांनी अंगणवाडीत येतांना एकसारख्या ड्रेसमध्ये यावे व त्यासाठी गणवेश हेच माध्यम आहे, असे आर.एम.डी. फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारिवाल म्हणाल्या.