बारामती (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील निराधारांना आधार देण्याचे काम नगरसेवक जय पाटील यांनी केले आहे . शहरातील 2 हजार निराधार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट जय पाटील यांनी स्वखर्चातून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ज्या गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचली नाही अशांना या उपक्रमद्वरे मदतीचा हात दिला जातआहे.
बारामती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न राबविला जात आहे. इतर सामाजिक संस्थांच्या मदतीचा ओघ देखील सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपत जय पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.इतर जिल्ह्यातून व राज्यातून बारामती शहरात वास्तव्यास असलेल्या निराधार लोकांपर्यंत ही मदत पोहोचवली जात आहे. त्यासाठी तांदूळ व गहू असे दहा टन धान्य स्वखर्चातून दिले आहे. शहरातील निराधार तसेच गरजूंना जीवनावश्यक अन्नधान्याचे किट घरपोच दिले जात आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जय पाटिल मित्र परिवारातर्फे हे धान्य वाटप केले जात आहे .ज्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाहीं अशा 2 हजार गरजू कुटुंबाना तसेच बारामती नगर परिषदेचे कंत्राटी कामगार यांना देखील मदत करण्यात येत आहे.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी अजितदादा पवार यांचे बारामती शहरावर बारकाईने लक्ष आहे. बारामती शहर कोरोना मुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. भीलवाडा पॅटर्ननुसार सध्या बारामती शहर सीलबंद आहे. त्यामुळे निराधार गरजू लोकांना मदत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासना बरोबर कार्यकर्त्यांना देखील केल्या आहेत . त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अभिप्रेत असे काम सुरू असून निराधार व गरजू 2 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची कीट देण्यात येत आहे. संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवला जात आहे. सद्य परिस्थिती पाहता समाजातील अनेकांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.
(जय पाटील ,नगरसेवक बारामती नगरपरिषद)