पुणे – इयत्ता बारावीचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता येत्या 21 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.
बारावीच्या निकालाचे गुणपत्रक व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख कनिष्ठ महाविद्यालयांना वितरणाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. विभागीय मंडळांनी सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार तयार केलेल्या निकालाची गुणपत्रके कनिष्ठ महाविद्यालयांना 20 ते 21 ऑगस्टदरम्यान वितरीत करावीत.
कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेऊन जादा वितरण केंद्र निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडकी संख्या वाढवून महाविद्यालयांना गुणपत्रिका हस्तांतरीत कराव्यात. महाविद्यालयांनी करोना नियमांचे पालन करून गुणपत्रक वितरण करावे, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.