पुणे : महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या महा-आयटीच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड मंगळवारी रात्री उशीरापर्यंत दुरुस्त झाली नसल्याने या केंद्रांची सेवा अद्यापही ठप्पच आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. हा तांत्रिक बिघाड असल्याने हा बिघाड दूर करण्यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. दरम्यान, सध्या 10 वी व 12 वीच्या परिक्षांचा निकाल जाहीर झाला असून प्रवेशासाठी विविध दाखले मिळण्यास विद्यार्थ्यांना अडचण येत आहे.
राज्य सरकारच्या महा-आयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या सेवा केंद्रांच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व्हर संथगतीने सुरू असून केंद्र चालकांकडून विविध दाखल्यांसाठीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, दाखले मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक केंद्र चालकांकडून नागरिकांना माघारी पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात येत आहेत. परिणामी, पुणे शहरातील 250, तर ग्रामीण भागातील 1 हजार 435 महा-ई-सेवा केंद्र आणि 14 सेतू केंद्रांवरील कामे खोळंबली आहेत.
महा-आयटीच्या एकाच सर्व्हरमध्ये राज्यातील सर्व संकलित माहिती (डाटा) साठविण्यात येतो. मात्र, यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने सर्व्हर बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. केवळ पुणेच नाहीतर राज्यातील बहुतांश केंद्रांची कामे थांबली आहेत.
दुरुस्तीचे काम सुरू
मुंबई येथील तज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञान विभागातील अभियंत्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, त्याबाबत किती कालावधी लागेल, याबाबत निश्चित सांगता येत नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सातत्याने मुंबईतील मुख्यालयाशी संपर्क करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.