पुणे : महा ई सेवा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र, महानगरपालिकेचे नागरी सुविधा केंद्र आणि सेतू केंद्र या सर्व केंद्रांना एकच नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ही सर्व केंद्र आता “आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने ओळखले जात आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत महा ई सेवा केंद्र सुरु करण्याचा जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.
सध्या ऑनलाइन पद्धतीने सेवा पुरविण्यासाठी महा ई सेवा केंद्र, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय येथील सेतू केंद्र, महानगरपालिकांनी स्थापन केलेली नागरी सुविधा केंद्र तर ग्रामपंचायतींमध्ये संग्राम केंद्र सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने 700 महा ई सेवा केंद्रांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार सुमारे 2 हजार अर्ज प्रशासनाकडे आले आहेत. या अर्जांची छाननी सुरू आहे. लवकरच या महा-ई-सेवा केंद्रांना मान्यता दिली जाणार आहे.
मिळणाऱ्या सुविधा
जन्म-मृत्यू दाखला, जात प्रमाणपत्र, आधारची प्रिंट, बॅंकेचे नवीन खाते, विमा, पेन्शन, पॅन कार्ड, पासपोर्ट, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी संबधित सेवा, मतदार यादीत नाव नोंदविणे, वीज बिल भरणा आदी प्रकारच्या सुविधा सेवा केंद्रातून मिळणार आहे.
असे असतील निकष
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल. जर 2011 च्या जनगणेनुसार 5 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भागात किमान 2 केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. तर महानगरपालिका व नगरपरिषदेमध्ये 10 हजार लोकसंख्येसाठी एक सेवा केंद्र यानुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.