पुणे – राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील (डायट) अधिकारी, कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरु ठेवले आहे. या आंदोलनस्थळी चर्चेसाठी शिक्षण आयुक्त, विद्या प्राधिकरणाचे संचालक साधे फिरकले सुध्दा नाहीत. हे अजबच म्हणावे लागणार आहे. वेतनाचा तिढा अद्यापही सुटला नसल्याने अधिकारी, कर्मचारी आता संतापले आहेत. दरम्यान जागतिक महिला दिनापासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे.
“डायट’ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून नियमितपणे निधी मिळत नसल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वेतनात अनियमितता निर्माण झालेली आहे. शासनाकडून वेतनच रखडविल्यामुळे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. वेतनासाठी कायमस्वरुपी लेखाशीर्ष निर्माण करुन त्यात निधी उपलब्ध करुन दिल्यानंतरच हा वेतनाचा तिढा सुटणार आहे. शालेय शिक्षण व वित्त विभाग यांच्यात याबाबत सत्कारात्मक चर्चा झाली तरच वेतनाचा प्रश्न निकाली निघणार आहे.
“डायट’ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 2 मार्च पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरु ठेवले आहे. यात उत्स्फुर्तपणे सहभागही वाढत चाललेला आहे. 17 मार्चपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे. यानंतरही प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.
“डायट’ च्या नांदेड शाखेच्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने 8 मार्चपासून मुंबई येथे आमरण उपोषण आंदोलन करणार आहे. थकीत वेतन त्वरीत मिळावे, सन 2014 पासून रखडलेल्या पदोन्नत्या द्याव्यात, दिव्यांग अधिकाऱ्यांना पदोन्नत्या मिळाव्यात, एमपीएससीकडून विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना सर्व लाभासाठी पात्र समजावे, पात्र अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, “डायट’ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रदान करा, अधिव्याख्यातांचा ग्रेड पे सुधारित करुन द्यावी आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.