अलवर (राजस्थान) – आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. तुम्ही काय केले? देशासाठी तुमच्या घरातील कुत्रा तरी मेला का अशी विचारणा करत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली. ते भारत जोडो यात्रेदरम्यान राजस्थानातील अलवर येथे बोलत होते.
त्यांनी देशासाठी कोणतेही बलिदान दिले नाही. त्याग केला नाही. तरिही ते देशभक्त आहेत आणि आम्ही काही बोललो तर आम्ही देशद्रोही ठरतो. भारतीय सैनिकांचा चीनच्या सैनिकांशी नियंत्रण रेषेजवळ जो संघर्ष झाला त्यावर आम्हाला संसदेत चर्चा करायची आहे. मात्र सरकारची त्यासाठी तयारी नाही. ते बाहेरतर वाघासारख्या डरकाळ्या फोडतात. मात्र प्रत्यक्षात उंदराची चाल चालतात. आम्ही देशासोबत आहोत. मात्र सरकार महत्वाची माहिती दडवून ठेवते आहे असेही खर्गे म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी इंग्रजीच्या विरोधात असल्याचा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. भाजपचे नेते जेथेही जातात तेथे ते इंग्रजीच्या विरोधात बोलतात. शाळांमध्ये इंग्रजी नको अशी त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांची स्वत:ची मुले कोणत्या शाळेत शिकतात हे त्यांना विचारले आहे का? यांचे सगळे मुख्यमंत्री, आमदार, खासदारांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिकतात.
देशातील गरिब मुलांनीही इंग्रजी भाषेतून शिकावे अशी यांची इच्छा नाही. अन्य भाषा शिकू नये असे आपले म्हणणे नाही. मात्र जर जगातील अन्य देशांसोबत तुम्हाला काम करायचे असेल तर तेथे हिंदी चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला इंग्रजीचेच ज्ञान आवश्यक असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.