मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करत आपण एकत्र आलो नाही तर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरीत राहावे लागेल असे म्हटले होते. तसेच, निवडणुका घेण्याची हिंमत नाही. हिंमत असेल तर लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिले होते. उद्धव ठाकरेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी,“उद्धव ठाकरे असं काहीतर बोलत असतात. सध्यातरी भारताच्या संविधानाप्रमाणे एकत्र निवडणुका होत नाहीत. उद्धव ठाकरे सर्व पक्षाचे नेते झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र करत ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा पंतप्रधानांनी नारा दिला आहे; त्याला समर्थन द्यावं. मग सर्व निवडणुका एकत्रित घेऊ,” असे म्हटले.
‘आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही भाजप म्हणजे हिंदूत्व नाही’ असे उद्धव ठाकरे म्हटले, याबद्दल विचारले असता फडणवीसांनी सांगितले , “उद्धव ठाकरेंना जैन आणि उत्तर भारतीयांची आता आठवण येत आहे. त्याचप्रमाणे कोण हिंदुत्ववादी आहे आणि नाही हे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहून उर्दूत कॅलेंडर काढले, हे सर्व जनतेने पाहिलं आहे,” असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“पंतप्रधान मोदी यांचे जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना वाचवले होते,” अशी आठवण सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “सेना- भाजप युतीच्या काळात ही युती अन्य पक्षांसाठी अस्पृश्य होती. आम्हाला वाळीत टाकल्यासारखे होते. कोणी साथ देत नव्हते तेव्हा बाळासाहेबांनी कोणाचीही पर्वा न करता मोदींना वाचविले. बाळासाहेबांनी त्यांना वाचविले नसते तर ते आज जेथे बसलेत तेथे पोहोचलेच नसते.”असेही त्यांनी यावेळी म्हटले.