सातारा, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मे महियात २१० गावे, आणि ६९४ वाड्या टंचाईग्रस्त असून 3 लाख 25 हजार 156 बाधित लोकसंख्या आहे. 2 लाख 8 हजार 806 बाधित पशुधन आहे. या साऱ्यांना 199 टँकरर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून 114 खासगी विहिरी आणि बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झआलेल्या बैठकीत श्री. डुडी यांनी टंचाई स्थितीचा आढावा सादर केला.त्यावेळी बोलत होते. वाई व खंडाळा तालुक्यसाठी दुष्काळ निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे.
वाई तालुक्यासाठी 22 कोटी 41 लाख तर खंडाळा तालुक्यासाठी 17 कोटी 82 लाख इतका निधी बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी वितरीत करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. हा निधी ई पंचनामा पोर्टलवर तहसलीदारांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
वाई व खंडाळा या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये वाई तालुक्यातील 7 आणि खंडाळा तालुक्यातील 4 महसूल मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 89 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ/ दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.
या महसूल मंडळांमध्ये शासन निर्णयानुसार सवलती लागू करण्यात आल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पूर्ण करणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, रोजगार हमीतील कामे यासारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
खरीप हंगाम लक्षात घेऊन टंचाई परिस्थितीबाबत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुरघास लागवड उपक्रमास गती देण्यात येऊन त्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. प्रकल्पांचे पाणी पोहोचले आहे त्या भागांमधील शेतकऱ्यांना ज्वारी आणि मका यांचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पशुधनासाठी ओला आणि सुका चाऱ्याचे जुलैपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे, असी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात बांबू लागवड अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून 10 हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे. पावसाला सुरुवात होताच पुन्हा या मोहिमेला गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.