जळगाव – करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी राज्य शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापी तीरावरील संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आज जुने मुक्ताबाई मंदिर, कोथळी-मुक्ताईनगर येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मोजके भाविक व मान्यवर उपस्थित होते.
आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा, मुक्ताईनगर सोबत पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची 312 वर्षांपासूनची परंपरा आहे. मध्यप्रदेश, खान्देश, विदर्भातील भाविक दिंड्यासह या सोहळ्यात सहभागी होत असतात. 700 किमीचे अंतर 33 दिवसात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पार पाडण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा सुरु आहे.
मात्र मागील वर्षांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातल्याने ही वारी पायी न जाता बसने होत आहे. यावर्षीसुद्धा करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता राज्य शासनाने संताच्या दहा मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई पालखीचा समावेश आहे.
या पालखीचे परंपरेनुसार ज्येष्ठ शु.4ला प्रस्थानाचा सोहळा आज जुने मुक्ताबाई मंदिरात सकाळी मोजकेच वारकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजीमंत्री एकनाथ खडसे, संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, पालखी सोहळा प्रमुख हभप रविंद्र महाराज हरणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रस्थान सोहळ्याचे करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता आला. पालखी प्रस्थानानंतर पालखीचा मुक्काम हा नवीन मुक्ताबाई मंदिरात असणार आहे, याठिकाणी पालखीचे नित्योपचार पूजापाठ करण्यात येतील. शासनाच्या पुढील सुचनांनुसार पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल.