वंदना बर्वे
उत्तर प्रदेशातील महिलांसाठी स्वातंत्र्य एका मृगजळासारखं असलं तरी विधानसभेच्या या निवडणुकीत थोड्या काळासाठी का होईना; पण त्यांचंही नशीब फडफडणार आहे. यूपीतील महिला मतदारांना खूश करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं खास शक्कल लढविली आहे. महिलांसाठी “कमल सहेली क्लब’च्या माध्यमातून “किटी पार्टी’चं आयोजन केलं जाणार आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात लढविली जाणार आहे. अशात, यूपीचं सिंहासन पुन्हा काबीज करण्यासाठी मुख्यमंत्री छातीला माती लावून मैदानात उतरले आहेत. शेतकरी आंदोलन, करोनाच्या काळातील गैरव्यवस्थापन आणि आता आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृत्यू अशा अनेक संकटांचा सामना योगी आदित्यनाथ यांना करावा लागणार आहे.
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविणारा पक्ष अशी भाजपची प्रतिमा तयार झाली आहे. वेगवेगळ्या घोषणा आणि वेगवेगळ्या योजनांमुळे मतदारही प्रभावित झाला आहे. विधानसभेच्या या निवडणुकीतही भाजप खास पद्धतीने प्रचार करणार आहे. संपूर्ण यूपीत महिला मतदारांसाठी “किटी पार्टी’चं आयोजन करण्याच्या योजनावर काम जोरात सुरू आहे.
यासाठी “कमल सहेली क्लब’ची स्थापना करून राज्यभरात शाखा उघडल्या जातील. एका शाखेत भाजपच्या 500 महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या असतील. त्यांच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी किटी पार्टीचं आयोजन केलं जाईल. महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांना क्लबमधील महिलांच्या नियमित संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे.
भाजपच्या या किटी पार्टीच्या दोन बाजू आहेत. शहरातील महिलांसाठी जे आयोजन केलं जाईल त्यास किटी पार्टी म्हटलं जाईल, तर ग्रामीण भागातील महिलांसाठी होणाऱ्या कार्यक्रमाला “ग्राम सभा चौपाल’ असं नाव देण्यात आलं आहे. शहरातील किटी पार्टीमध्ये वेगवेगळे खेळ, मॅरॅथॉन स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जातील, तर खेड्यांतील ग्राम सभा चौपालमध्ये महिलांच्या समस्यांवर चर्चा आणि त्याचं समाधान आदीवर पूर्णपणे फोकस राहणार आहे.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक यांसारख्या राज्यांतील महिलांना ज्याप्रकारची संधी उपलब्ध आहे तशी उत्तर प्रदेशातील महिलांना मिळत नाही. खरं सांगायचं म्हणजे, देशातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात होत असलेल्या बदलाकडे भारतीय जनता पक्षाची बारीक नजर असते. पक्षाची “थिंक टॅंक’ याचा बारकाईने अभ्यास करते. किटी पार्टीचं आयोजन करण्याची योजना याच अभ्यासाचा परिपाक आहे.
भाजपला वाटू लागलं आहे की, देशात महिला मतदार जागरूक होत आहेत. मतदानांतील त्यांची टक्केवारीसुद्धा वेगाने वाढत आहे. यामुळे भाजपने मतदारांच्या या वर्गाला विशेष महत्त्व देत त्यांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवायला सुरुवात केली आहे.
याशिवाय, भाजप “बूथ लेव्हल मॅनेजमेंट’ करण्याची तयारी करत आहे.
यासाठी 1 कोटी 63 लाख बूथवर पन्ना प्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. एक मजबूत संघटना म्हणून भाजपने निवडणुकीत प्रत्येक बूथपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकांना प्रत्येक बूथवर मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी दिली जाईल. निवडणुकीत मतदारांना बाहेर काढून त्यांना बूथवर नेण्याचे काम त्यांच्यावर सोपवले जाईल. या लोकांना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे, जे लवकरच पूर्ण केले जाईल.
पन्ना प्रमुख परिषदेचं आयोजन
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पन्ना प्रमुखांची तीन दिवसीय परिषद बोलाविली जाणार आहे. भाजपने नेहमीच पन्ना प्रमुखाची रणनीती प्रभावी मानली आहे. गुजरातच्या नारायणपुरा विधानसभा मतदारसंघातही पन्ना एका फेरीत प्रमुख पदाच्या भूमिकेत आहेत. पन्ना प्रमुखांना एक प्रकारे 30 घरांची जबाबदारी दिली जाते. पक्ष एका बूथवर 10 ते 15 पन्ना प्रमुखांना तैनात करत आहे. यूपी विधानसभा निवडणुकांमध्ये, पक्ष पुन्हा एकदा प्रयत्न केलेल्या आणि चाचणी केलेल्या या रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्याची तयारी करत आहे.
यावेळी निवडणुकीचं व्यवस्थापन सूक्ष्म स्तरापर्यंत केले जात आहे. मतदार यादीतील 60 मतदारांमधूनच एकाची पन्ना प्रमुख निवड केली जाणार आहे. कुणाशी बोलायचं, काय बोलायचं हे सर्व ते ठरवतील आणि मतदारांना बूथपर्यंत घेऊन जातील. मतदारांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी पक्षाने या रणनीतीवर फोकस केला आहे.
पन्ना प्रमुख ही शहा यांची कल्पना
देशाचे गृहमंत्री अमित शहा पन्ना प्रमुख योजनेचे जनक आहेत. 2017 मधील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 403 पैकी 312 जागा जिंकल्या होत्या. 39.67 टक्के मते मिळवून भाजपला मोठे यश मिळाले. दुसरीकडे, सपाला फक्त 47 जागा आणि बसपाला फक्त 19 जागा मिळाल्या.